धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार
धाराशिव लोकविचार
‘जिल्हा गुंतवणूक परिषद–धाराशिव २०२६’चे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवच्या औद्योगिक विकासाचा निर्धार व्यक्त केला. कृषी, अन्नप्रक्रिया, कृषीपूरक उद्योग, अक्षय ऊर्जा, पर्यटन तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याला औद्योगिक झेप देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेत ३७ उद्योगांसोबत तब्बल ७५३४.८५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून सुमारे ७५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. ही गुंतवणूक केवळ आकडेवारी नसून धाराशिवच्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि हजारो कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीची नवी आशा असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.
“ही परिषद केवळ उद्योगपतींची बैठक नसून धाराशिवच्या आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात आहे,” असे सांगत सरनाईक यांनी उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन केले.
स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिक पातळीवर उद्योग उभारणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभारही सरनाईक यांनी मानले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











