कळंब ड्रग्स प्रकरण ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!
जिल्हाधिकाऱ्यांच्या १२ ऑगस्टच्या आश्वासनानंतरही संयुक्त पत्रकार परिषद नाही — तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
कळंब | लोकविचार
कळंब ड्रग्स तस्करी प्रकरणातील नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा आणि मावळ येथील सुशांत सुतार यांची वाढीव पोलीस कोठडी संपल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या सहावर पोहोचली असून, सध्या सर्व सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, एवढी मोठी कारवाई होऊनही या ड्रग्स रॅकेटच्या मुळापर्यंत तपास पोहोचला आहे का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने कळंब-येरमाळा रोडवरील पायरा तलाव परिसरात कारवाई करून निखिल जाधव व अरविंद कांबळे यांच्याकडून ११.२१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले होते. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत नगरसेवक मोसीन मिर्झासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली.
मात्र, सहा आरोपी अटकेत असतानाही ड्रग्सचा पुरवठा नेमका कुठून होत होता? पेडलर किती आहेत? ड्रग्स कोणाला विकले जात होते? आर्थिक व्यवहारांची साखळी काय आहे? आरोपींचे सीडीआर, बँक व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीचा तपास झाला आहे का? या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१२ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर आश्वासन; मग पुढे काय झाले?
विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी १२ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ड्रग्स प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला असता जिल्हाधिकारी पुजार यांनी जिल्हा प्रशासनाची भूमिका अत्यंत कठोर असल्याचे स्पष्ट केले होते.
ड्रग्सविरोधात जिल्हा प्रशासन गंभीर असून कोणालाही सोडले जाणार नाही, तसेच पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ड्रग्सचे नेटवर्क मुळासकट उपटून टाकण्याची भूमिका असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.
याचवेळी या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका व तपासाची दिशा स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.
मात्र, त्या पत्रकार परिषदेला आता तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही त्या आश्वासनानुसार संयुक्त पत्रकार परिषद झाली का? तपासाची सद्यस्थिती काय आहे? ड्रग्स रॅकेटचा पुढील तपास कुठपर्यंत पोहोचला? याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
आश्वासनानंतर २० दिवस; संयुक्त पत्रकार परिषद कुठे?
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत कठोर भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे आता नागरिकांचा थेट सवाल आहे—ड्रग्स प्रकरण जिल्हा प्रशासनासाठी गंभीर आहे की नाही?
जर प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असेल, तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची संयुक्त बैठक कधी झाली? त्यामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले? तपास कोणत्या दिशेने सुरू आहे? आणखी आरोपी निष्पन्न झाले का? ड्रग्स पुरवठ्याची साखळी शोधण्यात तपास यंत्रणेला यश आले का?
या प्रश्नांची उत्तरे जिल्हा प्रशासनाने जनतेसमोर ठेवणे गरजेचे आहे.
नगरसेवकाची एसपींकडे लेखी तक्रार; कारवाईचे काय?
दरम्यान, कळंबमधील एका नगरसेवकाने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडे लेखी तक्रार देऊन या प्रकरणाच्या तपासाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. मात्र, या तक्रारीवर अद्याप कोणती ठोस कारवाई झाली, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
त्याचप्रमाणे RPI (खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनीही या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीतही अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.
एकीकडे तक्रारी, दुसरीकडे गंभीर आरोप आणि तिसरीकडे प्रशासनाकडून कठोर कारवाईची आश्वासने—मात्र प्रत्यक्षात तपास कुठपर्यंत पोहोचला, याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
वरिष्ठ अधिकारी संबंधितांना पाठीशी घालत आहेत का?
या प्रकरणात सातत्याने गंभीर तक्रारी आणि आरोप समोर येत असताना त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून पाठीशी घातले जात आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हे आरोप सत्य आहेत की नाहीत, याचा निर्णय तपास यंत्रणेलाच घ्यायचा आहे. मात्र, अशा आरोपांची स्वतंत्रपणे, निष्पक्षपणे आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज
कळंब ड्रग्स प्रकरणात स्थानिक पोलीस प्रशासनाच्या तपासाबाबत नागरिकांमध्ये विश्वासाचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आरोपींची संख्या सहावरच थांबणार की तपासातून आणखी ‘मोठी नावे’ समोर येणार? ड्रग्सचा पुरवठा कुठून झाला? आर्थिक साखळी कुठपर्यंत पोहोचली? या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे?
या सर्व प्रश्नांचा उलगडा होणे अत्यंत आवश्यक आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ड्रग्सविरोधात कठोर भूमिका घेतली असताना जिल्हा प्रशासनानेही त्याच भूमिकेची अंमलबजावणी प्रत्यक्ष कारवाईतून दाखवणे अपेक्षित आहे.
सहा आरोपींवर तपासाची इतिश्री होणार की ड्रग्स रॅकेटची मुळे खणून काढली जाणार?
याकडे आता केवळ कळंबच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद | 083900 88786










