धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडमध्ये; मंत्रालयात विकासकामांचा आढावा, मुदतबद्ध अंमलबजावणीचे आदेश
मुंबई Lokvichar – लोकविचार
धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेत विविध विभागांच्या प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन, ऊर्जा, शिक्षण आणि सार्वजनिक हिताच्या योजनांची मुदतबद्ध अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
बैठकीत श्रीक्षेत्र तुळजापूर येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या, निधी उपलब्धता तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीशी संबंधित बाबींवर चर्चा करून कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
धाराशिव जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर अधिक सक्षमपणे उभे करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित विठ्ठल मूर्ती प्रकल्प, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील गड-किल्ल्यांच्या संवर्धन व दुरुस्तीची कामेही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करावी, असे आदेशही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
याशिवाय मराठा समाज मंदिरासाठी जागा निश्चित करणे, तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय उभारणे, जनावरांसाठी आधुनिक स्मशानभूमी विकसित करणे, धर्मवीर आनंद दिघे थीम पार्कसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
भूम तालुक्यातील मौजे साडेसांगवी येथील पुलासाठी आवश्यक निधीबाबत ग्रामविकास विभागाने लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. हा पूल उभारल्यानंतर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून वाहतुकीची मोठी समस्या दूर होणार आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी निर्णय घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत नासा (अमेरिका) अभ्यासदौऱ्यासाठी २० विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या शेवटी प्रत्येक विभागाने निश्चित कालमर्यादेत विकासकामे पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्यानुसार काम करावे. जनतेच्या हिताची कोणतीही योजना रखडू नये, सर्व विभागांनी समन्वयाने काम करत धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुरातत्त्व विभाग, नगरपरिषद, पशुसंवर्धन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


