धाराशिवच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या साहिल शेखची मुंबई पोलीस दलात भरारी
धाराशिव लोकविचार
जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर कोणतेही यश प्राप्त करता येते, हे धाराशिव शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक साहिल साजिद शेख याने सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या परिस्थितीत वाढलेल्या साहिलची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून त्याच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव शहरातील सोलापूर रोड परिसरातील आगड गल्ली येथे राहणारा साहिल शेख हा सर्वसामान्य कुटुंबातील युवक आहे. त्याचे वडील साजिद सलीम शेख हे लाकडाचा छोटा-मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मर्यादित उत्पन्न आणि अनेक आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. कुटुंबाची परिस्थिती बेताची असतानाही साहिलने परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या ध्येयाचा पाठपुरावा सुरू ठेवला.
लहानपणापासूनच पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साहिलने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा आणि शारीरिक तयारीवर विशेष भर दिला. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक आव्हाने असूनही त्याने आपली जिद्द कायम ठेवली. नियमित अभ्यास, कठोर मेहनत आणि एकाग्रतेच्या जोरावर त्याने अखेर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले.
साहिलच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा मोठा त्याग आणि पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मुलाने नोकरी मिळवून कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने त्यांनी त्याच्यावर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी टाकली नाही. अभ्यास आणि भरतीची तयारी यासाठी त्याला आवश्यक ते स्वातंत्र्य व प्रोत्साहन दिले. आई-वडिलांच्या विश्वासाला आणि कष्टांना न्याय देत साहिलने हे यश संपादन केले.
मुंबई पोलीस दलात निवड झाल्याची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. शहरातील विविध भागांत त्याच्या अभिनंदनाचे फलक झळकले असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. सामान्य कुटुंबातील युवकाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कोणतीही परिस्थिती बदलता येते, याचे साहिल शेख हे जिवंत उदाहरण ठरले असून त्याच्या यशामुळे धाराशिव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

