“आपला धाराशिव कसा आहे?” बदलीनंतरही नाळ जपणारे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनुभव
नागरिकांशी आपुलकीचा संवाद, कर्मचाऱ्यांची सकारात्मक वागणूक; ‘पोलीस व्यवस्था अशीही असू शकते’ याचा प्रत्यय
सोलापूर | लोकविचार न्यूज
सामान्य नागरिकांच्या मनात पोलीस यंत्रणेबाबत अनेकदा भीती, दडपण किंवा नकारात्मक प्रतिमा दिसून येते. मात्र सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात दिनांक ७ मे २०२६ रोजी आलेला अनुभव या सर्वसाधारण समजाला छेद देणारा ठरला.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तथा धाराशिवचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना वैयक्तिक कामानिमित्त भेटण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर तेथे कर्मचाऱ्यांकडून मिळालेली आपुलकीची वागणूक विशेष लक्षवेधी ठरली.
कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना “साहेबांना भेटायचे आहे” असे सांगितल्यानंतर त्यांनी अत्यंत शांतपणे व आदराने संवाद साधत “साहेब सध्या बैठकीसाठी बाहेर गेले आहेत, सायंकाळी येतील, आपण थांबलात तर भेट होऊ शकते,” अशी माहिती दिली. विशेष म्हणजे कोणतीही ओळख न देता, “पत्रकार” असल्याचे न सांगता सामान्य नागरिक म्हणून गेले असतानाही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली संयमी व सकारात्मक भूमिका लक्षवेधी होती.
कार्यालयातील चौकशी कक्षात उपस्थित कर्मचारी प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत होते. काही तक्रारदारांचे प्रश्न जागेवर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून मार्गी लावण्याचा प्रयत्नही सुरू होता. त्यामुळे हे पोलीस अधीक्षक कार्यालय नसून एखादे लोकाभिमुख जनसंपर्क केंद्र असल्याचा अनुभव येत होता.
दरम्यान, अतुल कुलकर्णी यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही वेळाने एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरून “मी साहेबांचा बॉडीगार्ड बोलतोय,” असा आवाज आला. त्यांनी साहेब बैठकीत असल्याची माहिती देत भेटीसंदर्भात सतत संपर्क ठेवला.
थोड्याच वेळात पुन्हा फोन करून “साहेब सध्या व्हीसीमध्ये आहेत, पण आपली भेट होईल,” असा निरोप देण्यात आला. काही वेळाने अतुल कुलकर्णी स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि व्यस्त कामकाजातूनही त्यांनी प्रथम भेटीसाठी बोलावून घेतले.
“आपला धाराशिव कसा आहे?” हे अतुल कुलकर्णी यांचे पहिले शब्द ऐकताच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना “हे आपल्या धाराशिवचे पत्रकार आहेत,” अशी ओळख करून देत धाराशिवबाबत आत्मीयतेने चर्चा केली.
धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी राबवलेले विविध सामाजिक उपक्रम, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेले निर्णय, डीजे नियंत्रणाबाबत घेतलेली भूमिका, अवैध धंद्यांविरोधातील मोहिमा तसेच सामाजिक बांधिलकी जपत राबवलेले उपक्रम याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. पारधी समाजासाठी राबवण्यात आलेला “नवीन पहाट” उपक्रम हा राज्यभर चर्चेचा विषय ठरल्याचेही यावेळी नमूद केले.
तसेच सोलापूर ग्रामीण भागातही कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम राहावी यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे कार्यालयातील कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच सुरक्षारक्षकांकडून प्रत्येक नागरिकाला दिली जाणारी माहिती, संवादातील संयम आणि माणुसकीची वागणूक यामुळे “पोलीस व्यवस्था लोकाभिमुख असू शकते” याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
अनेकदा अधिकारी बदलीनंतर जुना जिल्हा, तेथील लोक किंवा संपर्क विसरून जातात, अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये असते. मात्र अतुल कुलकर्णी यांनी बदलीनंतरही धाराशिवशी जपलेली आत्मीयता आणि तेथील लोकांविषयी असलेली ओढ यामुळे ते अपवादात्मक अधिकारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील हा अनुभव केवळ एका अधिकाऱ्याचा नव्हे, तर संपूर्ण पोलीस व्यवस्थेतील सकारात्मकतेचा चेहरा ठरावा, अशीच भावना यानिमित्ताने व्यक्त करतो.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


