“सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहरात पावसाळा तोंडावर येताच अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये स्वच्छता मोहिमांचा धडाका लावला आहे. मात्र निवडून आल्यापासून जवळपास सहा महिने अदृश्य असलेले नगरसेवक अचानक खडबडून जागे झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. एका ट्रॅक्टर आणि एका जेसीबीच्या सहाय्याने एका दिवशी एका प्रभागात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवली जात असून त्याचा मोठा गाजावाजा सोशल मीडियावर केला जात आहे.नागरिकांचा प्रश्न मात्र सरळ आणि स्पष्ट आहे – केवळ काही तास स्वच्छता करून संपूर्ण प्रभाग स्वच्छ होणार आहे का? एका दिवसाच्या दिखाऊ मोहिमेमुळे अनेक महिन्यांपासून साचलेली घाण, तुंबलेल्या नाल्या आणि अस्वच्छतेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत का?विशेष म्हणजे ज्या नाल्या आणि रस्त्यांची स्वच्छता आज केली जात आहे, त्या यापूर्वी किती दिवस दुर्लक्षित होत्या? जर आज स्वच्छता करण्याची गरज भासली, तर आतापर्यंत स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार नेमके काय करत होते? संबंधित स्वच्छता ठेकेदारांचे बिल कोणत्या कामाच्या आधारे काढण्यात आले? जर स्वच्छता झालीच नव्हती तर नगरसेवकांनी सहा महिन्यांपासून याबाबत आवाज का उठवला नाही? ठेकेदारांवर कारवाईची मागणी का केली नाही?अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमेपेक्षा रिल्स आणि व्हिडिओ शूटिंगवरच अधिक भर दिला जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. काही मिनिटे यंत्रणेसोबत उभे राहून व्हिडिओ तयार करणे आणि त्यानंतर प्रभाग पुन्हा वाऱ्यावर सोडणे, हीच सध्या काही नगरसेवकांची कार्यपद्धती बनल्याचा आरोप होत आहे.नागरिकांच्या मते, संपूर्ण प्रभागाची नियमित आणि प्रभावी स्वच्छता झाल्यानंतर त्याचे कौतुक व्हायला हवे. मात्र केवळ पावसाळ्याच्या तोंडावर काही तासांची मोहीम राबवून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.या निमित्ताने धाराशिव नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कामकाजावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही आतापर्यंत नेमके कुठे होते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम खरोखरच शहर स्वच्छ करण्यासाठी आहे की केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, याचे उत्तर आता संबंधित नगरसेवक आणि नगर परिषद स्वच्छता प्रशासनालाच द्यावे लागणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

