आरटीई 25% प्रवेशासाठी ‘एक किलोमीटर’ अट रद्द करा दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
धाराशिव | लोकमदत न्यूज
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ‘घरापासून शाळा एक किलोमीटर अंतरावर असावी’ ही अट रद्द करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
सन 2026–27 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी शासनाने घरापासून शाळा एक किलोमीटर अंतरावर असावी अशी अट लागू केली आहे. यापूर्वी ही मर्यादा पाच किलोमीटरपर्यंत होती, त्यानंतर ते अंतर कमी करून तीन किलोमीटर पर्यंत करण्यात आली होती. मात्र सध्या ती यावर्षी आणखीन कमी करून एक किलोमीटर करण्यात आल्याने अनेक पालकांना अर्ज करताना अडचणी येत आहेत.
ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टलवर एक किलोमीटरच्या पुढील शाळा दिसत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येत नाहीत. त्यामुळे दुर्बल व वंचित घटकातील अनेक विद्यार्थी या शैक्षणिक संधीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या पाल्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी इच्छा असूनही अनेक पालकांना या अटीमुळे प्रवेश मिळवणे कठीण जात आहे.
दरम्यान, आरटीई ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2026 असल्याने ही अट तातडीने रद्द करून अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात यावी व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदरील निवेदन दत्ता (तात्या) पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी सुमेध क्षीरसागर, संतोष मोरे, संतोष पेठे, शाहूराज चव्हाण, बालाजी कांबळे, राहुल पेठे, सचिन बगाडे, राज मगर, अमर कांबळे, आशिष पेठे, सचिन पेठे, तानाजी क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर आदी उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
