अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा पोलिसांच्या दक्ष आणि प्रभावी कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून प्रवाश्यांच्या गाड्या अडवून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्री महामार्गावर वाहन थांबवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. याच काळात दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका डॉक्टर परिवाराला लक्ष्य बनवून दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती.
या गंभीर प्रकरणाचा तपास धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांच्या पथकाला देण्यात आला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून आणि पारंपरिक तपास पद्धतींचा आधार घेत या प्रकरणाचा अचूक मागोवा घेतला. अखेर अथक प्रयत्नांनंतर या टोळीतील दोन आरोपी अर्जुन बालाजी शिंदे व आशोक हिरामन शिंदे यांना अटक करण्यात आली.
चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर चार साथीदारांसह मुरूम परिसरात तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही अशाच प्रकारचे दरोडे टाकल्याचे उघड केले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली XUV500 गाडी, जॅक आणि ट्रक जप्त केले आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीत सुदर्शन कासार (स.पो.नि.), शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, शोभा बांगर, फरहान पठाण, राठोड, सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव तसेच QRT आणि RCP पथकातील सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, “गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी धाराशिव पोलिस कटिबद्ध असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,” असे त्यांनी नमूद केले.
या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे धाराशिव पोलिस दलाचा आत्मविश्वास आणखी वाढला असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास दृढ झाला आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786



