कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण! कळंब पोलीसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह, एसपी दखल घेणार का?
कळंब | लोकविचार
कळंब शहरात अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग, छेडछाड आणि अखेर तिच्या घरात घुसून मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणानंतर कळंब शहर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब शहरातील एका अल्पवयीन मुलीचा काही टवाळखोरांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पाठलाग केला जात होता. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात तिची छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
सुरुवातीला भीतीपोटी हा प्रकार दडपला गेला; मात्र संबंधित मुलीने धाडस दाखवत आपल्या पालकांना सर्व प्रकार सांगितला.यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेण्याऐवजी संबंधित तरुणांच्या पालकांशी संवाद साधून मुलांना समज देण्याचा प्रयत्न केला.
मात्र यानंतर परिस्थिती आणखी गंभीर बनली. आरोपानुसार, काही तरुणांनी थेट मुलीच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तिच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ / मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक नागरिक एकत्र येऊन जमाव पोलीस ठाण्यात गेले आणि संबंधितांवर कठोर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
नागरिकांच्या मते, ही केवळ एक घटना नसून कळंब शहरात गेल्या काही महिन्यांपासून टवाळखोरांचा वाढता उपद्रव गंभीर चिंता निर्माण करणारा आहे.शहरात ट्रिपल सीट वाहन चालविणे, कर्कश हॉर्न वाजवत रस्त्यांवर दहशत निर्माण करणे, शाळा-महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थिनींची छेडछाड करणे, सार्वजनिक ठिकाणी हुज्जत घालणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
त्याचबरोबर खुलेआम सुरू असलेली गुटखा विक्री, वारंवार कारवाया होऊनही सुरू असलेले अवैध धंदे, पत्त्यांचे क्लब आणि अलीकडील विविध गुन्हेगारी घटना यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
“मुली सुरक्षित आहेत का?”, “शाळा आणि महाविद्यालयात मुलींना निर्धास्तपणे पाठवावे का?”, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?” असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अनेकांनी कळंब पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढविणे, महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविणे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेनंतर पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.कळंब शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीस प्रशासनाची भूमिका आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित घटनेची चौकशी करावी, तसेच कळंब शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, यासाठी कळंब शहरात एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, नागरिकांच्या वाढत्या असंतोषाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार का, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











