फुकटच्या श्रेयासाठी पत्रकबाजी; केंद्रीय विद्यालय प्रकरणात आ. राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले !– सोमनाथ गुरवांचा आक्रमक हल्लाबोल
धाराशिव लोकविचार केंद्रीय विद्यालयाच्या प्रस्तावावर कोणताही ठोस पाठपुरावा नसताना केवळ श्रेय लाटण्यासाठी पत्रकबाजी करणारे आमदार राणा पाटील पुन्हा एकदा तोंडावर आपटले असून, अशा फुकटच्या श्रेयाच्या राजकारणाला जनता ओळखून आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी केला आहे.
शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गुरव यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका करत, केंद्रीय विद्यालयाच्या प्रश्नावर त्यांनी प्रसिद्ध केलेली माहिती अर्धवट व दिशाभूल करणारी असल्याचा दावा केला.
कोणतीही खातरजमा न करता केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पत्रके काढण्याची जुनी सवय राणा पाटील यांनी आता बंद करावी, असा इशाराही त्यांनी दिला.गुरव म्हणाले की, धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय मंजूर व्हावे यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी २०२२ पासून सातत्याने लोकसभेत पाठपुरावा केला आहे. लोकसभेच्या कामकाजात या विषयावर लक्षवेधी मांडण्यात आली असून, संबंधित विभागासोबत दोन बैठका देखील झाल्या आहेत.
आगामी अधिवेशनात २७ जुलै रोजी याच विषयावर प्रश्न उत्तरासाठी येणार आहे. ९ जुलै रोजी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रक्रिया सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून अधिकाऱ्यांचे पथक धाराशिवमध्ये पाहणीसाठी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.याशिवाय मार्च २०२५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती.
या बैठकीत विद्यालयासाठी जागेची निवड, आवश्यक प्रस्ताव पाठविणे आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याबाबत चर्चा झाली होती. या सर्व बाबी शासकीय नोंदींमध्ये उपलब्ध असून, त्याचे पुरावेही आहेत. त्यामुळे आता श्रेय घेण्यासाठी पत्रकबाजी करून इतिहास बदलता येणार नाही, असा टोला गुरव यांनी लगावला.
आमदार राणा पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातील सर्वात मोठी चूक म्हणजे पाहणी पथकाच्या भेटीची तारीख असल्याचेही गुरव यांनी नमूद केले. कोणतीही खातरजमा न करता चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात केंद्रीय विद्यालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी संबंधित पथक २२ जुलै रोजी धाराशिवमध्ये येणार आहे. चुकीची तारीख देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदारांनी आता तरी सत्य माहिती देणारे आणखी एक पत्रक काढावे, म्हणजे ते त्यांच्या स्वभावालाच शोभेल, असा उपरोधिक टोला गुरव यांनी लगावला.
केंद्रीय विद्यालयाच्या प्रश्नावर केलेल्या पाठपुराव्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार राणा पाटील यांची पत्रकबाजी जनतेसमोर उघडी पडली असून, वस्तुस्थिती आणि शासकीय नोंदींच्या आधारे सत्य समोर येईल, असा दावा करत सोमनाथ गुरव यांनी राणा पाटील यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल केला.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

