मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ‘विद्युत सागर’ संस्थेला धाराशिव-लातूरमध्ये आऊटसोर्सिंगची कामे कशी ?
टेंडर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह,सुरक्षा ठेव किती हेही गुलदस्त्यात!
धाराशिव लोकविचार
अंबाजोगाई येथील विद्युत सागर स्वयंरोजगार सुशिक्षित बेरोजगार संस्था या संस्थेच्या कार्यक्षेत्राबाबत आणि धाराशिव व लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या आऊटसोर्सिंग कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात टेंडर प्रक्रियेची पारदर्शकता आणि नियमांचे पालन झाले का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संस्थेच्या नोंदणीकृत उद्देश व नियमावलीनुसार तिचे कार्यक्षेत्र अंबाजोगाई शहर व परिसरापुरते मर्यादित असल्याचे नमूद आहे. तसेच संस्थेच्या सभासदांनाच काम देण्याची तरतूद असून पदाधिकारी व सदस्य हे संबंधित कार्यक्षेत्रातील असणे अपेक्षित असल्याची नोंद असल्याचे सांगितले जाते.
मात्र, याउलट ही संस्था धाराशिव व लातूर जिल्ह्यात विविध विभागांमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यक्षेत्राबाहेर संस्थेला नेमक्या कोणत्या नियमांनुसार कामे देण्यात आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मानव संसाधन विभागाने या त्रुटी वरिष्ठाच्या निदर्शनास आणून दिल्या तसेच विभागीय कार्यालय लातूर यांच्याही निदर्शनास आणून दिल्या तरीही
अधीक्षक अभियंता श्री संजय आडे हे नियमानुसारच टेंडर दिले असल्याचे सांगतात.
संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतातून ही प्रक्रिया पार पडली असावी, अशीही चर्चा असून त्यामुळे धाराशिव व लातूर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराच्या संधींवर परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक पात्र संस्था किंवा बेरोजगारांना संधी न देता कार्यक्षेत्राबाहेरील संस्थेला कामे देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित संस्थेच्या कामकाजाबाबत यापूर्वीही विविध स्तरावर प्रश्न उपस्थित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संस्थेची नोंदणी, नियमावली, कार्यक्षेत्र, सभासद नोंद, टेंडर प्रक्रिया, पात्रता निकष तसेच कामांचे वाटप यासंदर्भातील सर्व मूळ कागदपत्रांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याशिवाय, संबंधित टेंडर मंजूर करणारे अधिकारी, त्यांची भूमिका, मंजुरीची प्रक्रिया आणि कार्यक्षेत्राबाहेर कामे देण्यामागील कारणांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले आहे की सर्व प्रक्रिया कायदेशीर चौकटीत पार पडली आहे, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

