मोटारी आणि वायर चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त जि.प. सदस्य सुनील बनसोडे यांचे थेट पोलिसांना निवेदन
नळदुर्ग प्रतिनिधी. अझहर शेख
तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील तब्बल २० ते २२ गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी आणि विद्युत वायरच्या चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा पुरता हवालदील झाला असून, पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सुनील नामदेव बनसोडे यांनी थेट पोलीस प्रशासनाला ललकारले असून नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कायदेशीर कारवाईसाठी अधिकृत पत्र दिले आहे.सुनील बनसोडे यांनी आपल्या पत्रात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मतदारसंघात सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. विहिरी आणि तलावावर असणाऱ्या मोटारी रात्रीच्या वेळी लंपास केल्या जात आहेत. पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे. मतदारसंघातील खालील गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे:
दिधेंगाव, अरबळी, येवती, चिवरी (उ), शिरगापूर, बाभळगाव, इटकळ, केशेगाव, निलेगाव, देवसिंगा (नळ), गुळहाळी, शहापूर, सराटी, हिप्परगा ताड, फुलवाडी, केरूर.यापूर्वी ज्यांच्यावर अशा चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक समज देण्यात यावी आणि रात्रीची गस्त वाढवण्यात यावी,” अशी आग्रही मागणी बनसोडे यांनी केली आहे.
या सदरील निवेदनाची प्रत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री धाराशिव, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक धाराशिव यांनाही पाठवल्या असून, जर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आता यावर नळदुर्ग पोलीस काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, तातडीने गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786



