स्मार्ट मीटर सक्तीविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेसचे आंदोलन; महावितरणला निवेदन…
ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविणे, स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी तसेच सर्वसामान्य ग्राहकांवर होणारा आर्थिक भार याच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण), धाराशिव येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी तसेच नागरिक, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान काँग्रेस भवन ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पर्यंत निषेधार्थ रॅली काढण्यात आली.महावितरणमार्फत राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त वीजबिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. वीज वापरामध्ये कोणताही मोठा बदल नसतानाही वीजबिलामध्ये मोठी वाढ झाल्याने गरीब, शेतकरी, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, लघु व्यावसायिक व मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच स्मार्ट मीटरच्या रीडिंगमध्ये पारदर्शकता नसल्याने आणि बिलाच्या गणनेबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व अविश्वास निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.स्मार्ट मीटरच्या विषयावर महाराष्ट्र विधानसभेतही चर्चा झाली असून, ग्राहकांची इच्छा नसताना त्यांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. असे असतानाही अनेक भागात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याने नागरिकांमध्ये अधिक नाराजी निर्माण होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.काँग्रेसच्या प्रमुख मागण्याग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, जिल्ह्यात कोणतेही स्मार्ट मीटर सक्तीने बसवू नये, तसेच ज्यांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत त्यांना पूर्वीचे मीटर पुन्हा महावितरणमार्फत बसवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढलेल्या वीजबिलांची उच्चस्तरीय, स्वतंत्र व तांत्रिक चौकशी करावी, चुकीचे किंवा अवाजवी वीजबिल तात्काळ रद्द करून फेरबिल देण्यात यावे आणि स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत स्मार्ट मीटर योजनेची अंमलबजावणी स्थगित करावी, जिल्हास्तरीय विशेष तक्रार निवारण समिती स्थापन करून ग्राहकांच्या सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करावे आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेची काटेकोर अंमलबजावणी करून कोणत्याही ग्राहकावर त्याच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही, याबाबत स्पष्ट आदेश जारी करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.तात्काळ मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन व महावितरण प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.











