देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास; अतिक्रमण हटल्याने भाजी विक्रेत्यांना दिलासा
धाराशिव | लोकविचार
धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड ते नेहरू चौक (भाजी मंडई) या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि गैरसोयींना सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशपांडे स्टँड नेहरू चौक येथील भाजी मंडईसाठी नगर परिषदेने दिलेल्या जागेवर काही धनदांडग्यांनी अनधिकृतपणे पत्र्याच्या टपऱ्या व दुकाने उभारून ती इतरांना भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगर परिषदेने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली.
या अतिक्रमणामुळे ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांना मुख्य रस्त्यावरच व्यवसाय करावा लागत होता. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातांचाही धोका वाढला होता. मात्र प्रभाग क्रमांक १३च्या नगरसेविका वैशाली रवी मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच भाजपा नेते रवी मुंडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या प्रयत्नांमुळे ही कारवाई शक्य झाली.
नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे आणि नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने अतिक्रमण हटवून जागा भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशपांडे स्टँड ते नेहरू चौक हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यापुढेही या परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी अतिक्रमणविरोधी पथकाच्या माध्यमातून नियमित देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका वैशाली रवी मुंडे यांनी ‘लोकविचार’शी बोलताना दिली. या कारवाईबद्दल नागरिकांनी भाजपा नेते रवी मुंडे आणि नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











