वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का; विद्यमान सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
धाराशिव लोकविचार
धाराशिव तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, गावचे विद्यमान सरपंच बळीराम कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप युवा नेते मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी काकासाहेब कांबळे, धनाजी जाधव, प्रदीप जानराव, गौरव जाधव, सुभाष माळी, सौरभ जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेवर तसेच भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजप परिवारात प्रवेश केल्याचे सांगितले.
प्रवेश सोहळ्यात मल्हार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील, शिवाजी वाडकर, सुधीर पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब वाडकर, सुरेश मुळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नव्याने प्रवेश केलेले कांबळे यांनी सांगितले की धाराशिव जिल्ह्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या ग्रामीण भागातील जनसंपर्क, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि लोकहिताच्या कामांमुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी सुरू असलेली घोडदौड, गावागावांत राबविण्यात येणारे लोकोपयोगी उपक्रम आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली विकासाची कामे यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरपंच बळीराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशामुळे वडगाव (सिद्धेश्वर) परिसरात भाजपची ताकद अधिक बळकट झाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच या घडामोडीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.
ग्रामीण भागातील प्रभावी पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये झालेला हा प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, वडगाव (सिद्धेश्वर) परिसरातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











