धाराशिवमध्ये १५१ फुटी स्वराज्य ध्वजाचे दिमाखात लोकार्पण;
“भगवा ध्वज फडकवताना अलौकिक ऊर्जा जाणवली, उर अभिमानाने भरून आले” — पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव लोकविचार
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या ४५ मीटर अर्थात १५१ फुटी भव्य स्वराज्य ध्वजाचे लोकार्पण आज स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्याला शिवप्रेमी आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठा साम्राज्याचा मानबिंदू असलेला हा स्वराज्य ध्वज फडकवताना एक अलौकिक ऊर्जा जाणवली आणि उर अभिमानाने भरून आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले.
धाराशिव शहरात भव्य भगवा ध्वज उभारण्यात यावा, ही मराठा समाजाची प्रमुख आणि सातत्याने मांडण्यात आलेली मागणी होती.
या मागणीची दखल घेत धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) ऑगस्ट २०२५ मधील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी तब्बल ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाकडे विशेष लक्ष देत प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
भगवा ध्वज हा केवळ एक झेंडा नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहे. लाखो मराठ्यांसाठी प्रेरणा आणि बळ देणारा हा ऊर्जा स्रोत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात डौलाने फडकणारा हा १५१ फुटी स्वराज्य ध्वज धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच या परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त करून देणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या चौकात उभारण्यात आलेला हा भव्य ध्वज नागरिकांच्या अभिमानाचा विषय ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या लोकार्पण सोहळ्यास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे, नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरज साळुंके, मराठा सेवक बलराज रणदिवे, आकाश कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











