‘हर घर तिरंगा’ रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार विना हेल्मेट; कायदा केवळ सामान्य नागरिकांसाठीच?
धाराशिव लोकविचार
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ऑगस्ट रोजी धाराशिवमध्ये आयोजित सायकल व ई-बाईक रॅलीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार स्वतः मोटारसायकलवर सहभागी झाले. मात्र, यावेळी त्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे दिसून आल्याने आता या प्रकारावरून प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे या रॅलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके हे देखील सहभागी होते. वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि जनतेमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागृती करण्याची जबाबदारी असलेल्या विभागातील अधिकारी उपस्थित असतानाच जिल्हाधिकारी विना हेल्मेट मोटारसायकलवरून रॅलीत सहभागी झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश असताना, त्याच कार्यक्रमात वाहतूक नियमांचे पालन झाले का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सामान्य नागरिकांनी मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक असताना, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच नियमांचे पालन झाले नाही तर कायदा आणि नियम हे केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
या रॅलीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी विना हेल्मेट रॅलीत सहभागी झाल्याचा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आहे.
‘कायदा सर्वांसाठी समान की केवळ जनतेसाठी?’ हा प्रश्न या घटनेनंतर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786











