आरोपांचे बिंग फुटले? डीपी प्रकरणात अरुण निटुरे यांच्या दाव्यांवरच ताकविकी गावकऱ्यांचे गंभीर प्रश्नचिन्ह!
ताकविकी येथील डीपीबाबतच्या आरोपांचे खंडन
शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे चुकीचे – सरपंच
ताकवीकी येथील मंजूर डीपी सर्व शेतकऱ्यांसाठीच
वैयक्तिक असल्याचा दावा चुकीचा असल्याचे गावकऱ्यांचे स्पष्टीकरण
धाराशिव लोकविचार
मौजे ताकवीकी येथे मंजूर झालेल्या वीज डीपी संदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रसारित करण्यात आलेल्या काही आरोपांवर संबंधित शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत खंडन केले आहे. प्रसारित झालेल्या माहितीत वस्तुस्थिती लपवून दिशाभूल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.तसेच तोतया पीए म्हणत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.निवेदन देणाऱ्या निटुरे यांनीच शेतकऱ्याकडे पैश्याची मागणी केल्याचे शेतकरी सांगत असल्याने निटुरे यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे सिद्ध होत आहेत.
संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सदरील डीपी ही कोणत्याही एका व्यक्तीसाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी मंजूर करण्यात आलेली नसून परिसरातील पात्र शेतकऱ्यांना वीजपुरवठा मिळावा यासाठी मंजूर करण्यात आलेली सार्वजनिक सुविधा आहे. मात्र, अरुण निटुरे यांनी ही डीपी स्वतःच्या प्रयत्नांतून मंजूर करून आणल्याचे सांगण्यात येत असून त्याआधारे शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मंजूर असलेल्या डीपीवरून इतर शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यास अडथळे निर्माण केले जात असून ही डीपी वैयक्तिक असल्याचा दावा करून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता रडे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली असल्याचे सांगण्यात आले. तसेच डीपीसंदर्भातील सर्व प्रशासकीय नोंदी आणि मंजुरी प्रक्रिया तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, एका वृत्तातून करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसून त्यामुळे गावातील शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
या प्रकरणी सरपंच राजपूत म्हणाले…
“मौजे ताकवीकी येथील मंजूर डीपी ही कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसून सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी असलेली सुविधा आहे. याबाबत गैरसमज निर्माण करणारी माहिती पसरविण्याऐवजी संबंधित विभागाच्या नोंदी तपासून वस्तुस्थिती समोर आणावी. गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळणे आणि कोणत्याही प्रकारचा संभ्रम दूर होणे आवश्यक आहे.”
— राजपूत सरपंच, ग्रामपंचायत मौ.ताकवीकी
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


