भारत विद्यालय मुख्याध्यापकांच्या पत्राची दखल मार्गावर प्रशासनाची ‘मलमपट्टी’ विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनाचे आभार
धाराशिव लोकविचार
प्रभाग क्रमांक १७ व २० मधील धारसुर मर्दिनी कमान ते भारत विद्यालय, धाराशिव या मार्गाच्या दुरवस्थेबाबत भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच परीक्षार्थींना होणाऱ्या गैरसोयीबाबत लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाने या मार्गावर काही प्रमाणात काम केल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रविवार १४ जून २०२६ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी भारत विद्यालय येथे परीक्षा केंद्र असल्याने परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि स्टाफ यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी शाळा व्यवस्थापनाने पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने काही ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली. मात्र रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजविण्यात आलेले नसून अनेक ठिकाणी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शाळेच्या परिसरात अजूनही पावसाचे पाणी साचलेले आहे. तसेच रस्त्यालगत असलेली भंगार वाहने आणि इतर साहित्यही हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही कारवाई कायमस्वरूपी उपाययोजना नसून केवळ वरवरची मलमपट्टी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
काही नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती आणि परिसराची स्वच्छता करण्याऐवजी केवळ फोटोसेशनसाठी किंवा वरिष्ठांना काम झाल्याचे दाखविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली का? कारण प्रत्यक्ष परिस्थितीत अनेक समस्या अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, प्रशासनाने केलेल्या या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय व्यक्ती पुढे येत असल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या मते, या कामाची सुरुवात भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या पत्रव्यवहार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू झालेल्या कामाचे अनावश्यक राजकारण करू नये, अशी भूमिका नागरिक व्यक्त करत आहेत.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिलासा मिळावा यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत असून, तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी संपूर्ण रस्ता दुरुस्त करून परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नांचाही कायमस्वरूपी निपटारा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


