धाराशिवमध्ये ‘थंड पाण्याच्या’ नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ! तुकाराम मुंडे यांचे लक्ष RO व जार प्लांटकडे वळणार का?
धाराशिव लोकविचार
भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असताना शहरातील थंड पाण्याच्या जारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाढत्या मागणीचा फायदा घेत अनेक RO / पाणी जार प्लांट चालक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांतून होत आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक पाणी जार प्रकल्पांची अन्न व औषध प्रशासन (FDA) कडे नोंदणीच नसल्याची चर्चा असून, तरीही हे प्लांट सर्रासपणे सुरू आहेत.
नियमांनुसार पिण्याच्या पाण्याचे नियमित नमुने तपासणे, प्रयोगशाळा चाचणी करणे आणि गुणवत्ता अहवाल ठेवणे बंधनकारक असते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ पाणी थंड करून किंवा साधी प्रक्रिया करून जारमध्ये भरून विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या पाण्याची गुणवत्ता काय, त्यामध्ये जीवाणू किंवा इतर घातक घटक आहेत का, याची कोणतीही खात्री नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्यात FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी भेसळयुक्त पनीर, दूध, खवा तसेच हॉटेल व्यवसायातील अनेक गैरप्रकारांवर कठोर कारवाई करत मोठी भेसळ माफियांवर दहशत निर्माण केली आहे. राज्यभरात अनेक बोगस खाद्यपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांवर धडक कारवाया झाल्या. मात्र धाराशिवमधील RO आणि पाणी जार व्यवसायाकडे अद्याप संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरात एकूण किती RO प्लांट कार्यरत आहेत, त्यापैकी किती प्लांटना वैध परवाने आहेत, किती जणांनी FDA कडे नोंदणी केली आहे आणि किती प्रकल्प बेकायदेशीरपणे सुरू आहेत, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच सर्व प्लांटची पाणी गुणवत्ता तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयाकडे स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती तपासण्या केल्या, किती नमुने तपासले आणि किती कारवाया केल्या, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस RO प्लांट आणि पाणी जार चालकांवर तातडीने कारवाई करून शहरातील संपूर्ण पाणी व्यवसायाची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. तुकाराम मुंडे यांचे लक्ष धाराशिवमधील या गंभीर प्रश्नाकडे वळणार का आणि स्थानिक FDA प्रशासनाला धडक कारवाईस भाग पाडणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

