तोतया पोलिसाच्या रुबाबामागे कोणाचा वरदहस्त? विनयभंगाच्या तक्रारीपूर्वीच ठाण्यातून पळवून लावल्याचा गंभीर आरोप! सखोल चौकशीची मागणी
धाराशिव लोकविचार
आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ७५ व ७८(१) अन्वये एका ३६ वर्षीय महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती १३ जून रोजी दुपारी कामानिमित्त समर्थ नगर परिसरात गेली होती. काम आटोपून जिल्हा परिषदेच्या बाजूच्या रस्त्याने खाजगी नोकरी करीत असलेल्या कार्यालयाकडे जात असताना दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास एका मोटारसायकलस्वाराने तिचा पाठलाग केला. संबंधित व्यक्तीने महिलेकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर “तू काय अप्सरा लागून गेली आहेस का?” असे म्हणत तिचा डावा हात धरून तिच्याशी हुज्जत घालत विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केल्याने तिच्या भावाचा मित्र तेथे आला. त्याला पाहताच संबंधित व्यक्ती मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र मोटारसायकलचा क्रमांक एमएच-१३-सीएल-८१७० असल्याचे नोंदवण्यात आले आणि महिलेच्या भावाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर संशयिताला पकडून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये आणल्याचा दावा पीडित महिलेच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.मात्र, स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवणारा आणि जिल्ह्यात “झिरो पोलीस” किंवा पोलीस खबऱ्या म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला आता पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. विशेष म्हणजे पीडितेची फिर्याद नोंदवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात नसल्याने पाच ते सहा तास लागले.
पीडितेच्या भावाने आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणानंतरही संबंधित व्यक्ती पोलीस पोलिस ठाण्यात रुबाबात वावरत होती आणि कोणत्याही प्रकारची भीती त्याच्या वागण्यात दिसत नव्हती. त्यामुळे या व्यक्तीला नेमका कोणाचा आश्रय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही स्वतःला पोलीस म्हणून वावरत असल्याचे तसेच विविध गैरप्रकारांचे आरोप झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वी धाराशिव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एका प्रकरणातही त्याची चौकशी झाल्याची चर्चा होती. त्या प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती, मात्र संबंधित व्यक्तीवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे समोर आले नाही.या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संशयिताला पोलीस स्टेशनमधून नेमके कोणी सोडले? तो स्वतः बाहेर गेला की त्याला मदत करण्यात आली? तो पोलीस स्टेशनमध्ये किती वेळ होता? या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी होत आहे.तसेच घटना घडल्यानंतर संशयिताने कोणकोणत्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधला, त्यामध्ये नेमके काय संभाषण झाले, याचाही तांत्रिक तपास करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस स्टेशनमधील नोंदींची सखोल तपासणी झाल्यास या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात, असे मत नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.नागरिकांमध्येही या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण असून, जर यापूर्वीच संबंधित व्यक्तीवर झालेल्या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करण्यात आली असती, तर एखाद्या महिलेच्या विनयभंगासारखे गंभीर कृत्य करण्याचे धाडस त्याने केले नसते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच स्वतःला पोलीस म्हणून वावरणाऱ्या अशा व्यक्तींना कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त आहे का, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786



