“प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई लोकविचार
एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून बहुतेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र आंदोलनाच्या माध्यमातून प्रवाशांना वेठीस धरू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
शिव-परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अभिनंदन व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की, एसटी ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच प्रवाशांच्या सुविधांचाही विचार करणे आवश्यक आहे.
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यास त्याचा लाभ एसटी कर्मचाऱ्यांनाही आपोआप मिळणार आहे. तसेच घरभाडे भत्त्यात वाढ करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उर्वरित आर्थिक मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील असून संवादाचा मार्ग कायम खुला आहे. संघर्षाऐवजी समन्वय आणि चर्चेच्या माध्यमातूनच सर्वांचे हित साधले जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


