तेरणा कारखान्याच्या मालमत्तेबाबत सुरू असलेल्या वादात कामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कामगारांच्या थकीत देयकांवर मौन, मालमत्ता विक्रीवर आंदोलन; संघर्ष समितीची दुटप्पी भूमिका?
ढोकी, ता. धाराशिव : तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत अलीकडे विविध स्तरावर हालचाली सुरू असताना कारखान्याच्या माजी कामगारांनी आपल्या थकीत देयकांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली आहे.
कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. त्यावेळी संबंधित बँकेकडून मिळणाऱ्या भाडे उत्पन्नातून कारखान्याच्या कामगारांची थकीत देणी तसेच बँकेचे कर्ज वसूल करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन व इतर देयके प्रलंबित असल्याची खंत नागरिक आणि कामगारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कारखान्याची काही मालमत्ता विक्रीस काढण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर काही तथाकथित संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारखान्याची जमीन विक्रीस विरोध दर्शविला आहे. तथापि, कारखान्याच्या मालमत्तेच्या प्रश्नावर भूमिका मांडणाऱ्यांनी कामगारांच्या थकीत देयकांच्या प्रश्नावर यापूर्वी किती सक्रिय भूमिका घेतली, असा सवाल नागरिक आणि माजी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कारखाना बंद झाल्यानंतर परिसरातील मालमत्तेभोवती वाढलेले अनधिकृत ताबे, अवैध धंदे, बेकायदेशीर वापर तसेच काही हितसंबंधी घटकांच्या हालचालींबाबतही संबंधितांनी कधी आवाज उठविला होता का, अशी चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे.
माजी कामगारांचे म्हणणे आहे की, कारखान्याच्या मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेताना कायदेशीर प्रक्रिया अवलंबण्यात यावी. मात्र त्या प्रक्रियेतून उपलब्ध होणाऱ्या निधीतून सर्वप्रथम कामगारांची थकीत देणी अदा करण्यात यावीत. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे कारखान्यासाठी दिली असून आजही त्यांचे लाखो रुपयांचे हक्काचे पैसे अडकून असल्याचे त्यांनी नमूद केले.
“कारखान्याची मालमत्ता कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या स्वार्थासाठी अडकून राहू नये. कायद्याच्या चौकटीत राहून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धाराशिव यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि कामगारांना न्याय द्यावा,” अशी मागणी माजी कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी केली आहे.


