स्थगिती आदेश धाब्यावर वादग्रस्त “महाकाली” कला केंद्र सुरूच! – उलटा चोर कोतवालाला दाटे, जिल्हाधिकाऱ्यांनाच न्यायालयात आव्हान!
धाराशिव | लोकमदत न्यूज
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील बहुचर्चित महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून या संदर्भातील सुनावणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात होणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कला केंद्र स्थगित ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही ते राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. त्यातच उलट जिल्हाधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करून एक प्रकारे त्यांनाच न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने प्रकरण अधिकच वादग्रस्त बनले आहे.
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र सुरू करण्यासाठी राजाभाऊ सिताराम माळी यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र तपासणीनंतर २८ एप्रिल रोजी हा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यानंतरही सदर कला केंद्र सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर विविध विभागांकडून तपासणी करण्यात आली.
पोलिस अधीक्षकांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात महाकाली कला केंद्र अक्षय साळुंखे यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्याचे नमूद केले आहे. नियमानुसार कोणताही परवाना भाडेतत्त्वावर देता येत नसताना ही बाब घडल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे. तसेच पारंपरिक वाद्यांच्या साथीने कार्यक्रम सादर करण्याऐवजी साउंड सिस्टीमवर नृत्य सादरीकरण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
कला केंद्रात कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत मागणी करूनही ती देण्यात आलेली नाही. तसेच कार्यक्रमासाठी कोणतीही छापील तिकीटे दिली जात नसल्याचे आणि जीएसटीची नोंद नसल्याचेही तपासणीत आढळून आले आहे.
दरम्यान, ५ ऑगस्ट २०२५ रोजी कला केंद्रासमोर दोन गटांत भांडण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भाडेतत्त्वावर कला केंद्र चालवणारे अक्षय साळुंखे यांच्यासह काहींविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर कळंब येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात कला केंद्राच्या इमारतीसाठी कोणताही बांधकाम परवाना उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अंदाजे ५० आर क्षेत्रावर बांधकाम करण्यात आले असून प्रवेश व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दोन मार्ग नसल्याचेही आढळून आले.
नियमांनुसार रंगमंचाची योग्य व्यवस्था नसल्याचे तसेच प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. त्याचबरोबर नृत्य सादरीकरणासाठी दहा वातानुकूलित खोल्या उपलब्ध असून त्या खोल्यांमध्ये कार्यक्रम सादर होत असल्याची माहिती तेथील कलाकारांनी दिली.
याशिवाय कला केंद्राच्या परिसरालगत बियर बार तसेच लॉजिंगसह हॉटेल सुरू असल्याची बाबही तपासणीत समोर आली आहे. ग्रामपंचायतीचा ठराव पाहताना तो ग्रामसभेचा नसून मासिक सभेचा असल्याचे आढळून आले. तसेच त्या ठरावावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्याही नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, येरमाळा येथील सहायक पोलीस निरीक्षकांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात अंतिम न्यायालयीन निर्णय होईपर्यंत महाकाली कला केंद्र सील करण्याची विनंती केली आहे. या केंद्राशी संबंधित सहा गुन्ह्यांची यादीही पोलिसांनी दिली असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राला नाहरकत देण्याबाबतचा अर्ज प्रशासनाने नामंजूर करूनही हा व्यवसाय सुरू असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व बाबी होणाऱ्या सुनावणीत न्यायालयासमोर मांडल्या जाणार असून पुढे न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
