“रिन्यू एनर्जी कंपनीची शेतकऱ्यांवर दडपशाही! ऊस उभा असतानाच जबरदस्तीने टॉवर उभारणी; विरोध करणाऱ्या कुटुंबाला मारहाण! कारवाईची मागणी”
धाराशिव लोकविचार
धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील महिला शेतकरी छाया सोमनाथ तिघाडे यांच्या शेतात उभ्या उसाच्या पिकात जबरदस्तीने वीजवाहिनीचा टॉवर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप मे. रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा. लि. कंपनीवर करण्यात आला आहे. या बेकायदेशीर कामाला विरोध केल्यामुळे कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला असून, संबंधित टॉवरचे काम तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पीडित शेतकरी छाया सोमनाथ तिघाडे यांच्या नावावर कनगरा येथील गट क्रमांक १७१ मध्ये १ हेक्टर २१ आर क्षेत्राची शेती आहे. या शेतामध्ये मोठ्या मेहनतीने ऊस पिकविण्यात आला असून, त्याच शेतातून वीजवाहिनी नेण्यासाठी मे. रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा. लि. कंपनीने अधिकारपत्रधारक प्रतिनिधी चंदन शर्मा यांच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही स्पष्ट संमती न घेता कंपनीने टॉवर उभारणीसाठी लागणारे साहित्य थेट शेतात आणून टाकले. एवढेच नव्हे तर उभ्या उसाच्या पिकामध्ये मोठमोठे खड्डे खोदून पिकाचे नुकसान करण्यात आले. याबाबत जाब विचारत काम थांबविण्याची विनंती केली असता, कंपनीच्या संबंधितांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, संरक्षण मिळण्याऐवजी बेंबळी पोलिसांनीही शेतकरी कुटुंबालाच मारहाण करून त्यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, तसेच त्यांच्याकडील मोबाईल फोनही हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे.
उभ्या पिकात बळजबरीने टॉवर उभारल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून भविष्यात शेती करणेही कठीण होईल, अशी भीती तिघाडे कुटुंबाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उभ्या उसाच्या शेतात सुरू असलेले खोदकाम आणि टॉवर उभारणीचे काम तात्काळ रद्द करून संबंधित कंपनीच्या अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छाया तिघाडे यांचे पती सोमनाथ तिघाडे तसेच रामेश्वर आणि श्रीकृष्ण सोमनाथ तिघाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवरील हक्क, संमतीशिवाय सुरू होणारी कामे आणि अशा प्रकल्पांमुळे होणारे नुकसान या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


