कळंब ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट? मुख्य सूत्रधाराला अभय! ११ ग्रॅमचा पंचनामा करून मोठा साठा दडपल्याची चर्चा पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न!
कळंब | लोकविचार (विशेष प्रतिनिधी)
कळंब शहरातील एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर समोर येत असलेल्या माहितीमुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या या कारवाईत पोलिसांनी ११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्याचा दावा केला होता. मात्र, आता कळंब शहरातील चौका चौकात,टपरीवर,चहा टपरीवर तसेच संपूर्ण शहरात आणि विविध स्तरांतून होत असलेल्या खमंग चर्चेनुसार प्रत्यक्षात छाप्यात मोठा ड्रग्ज साठा सापडल्याची, परंतु अधिकृत नोंदीत केवळ ११.२१ ग्रॅमच दाखवण्यात आल्याचे सांगत मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, या संपूर्ण रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार छाप्यावेळी पोलिसांच्या ताब्यात होता, मात्र राजकीय वरदहस्त असल्याने काही वेळातच त्याला सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्याऐवजी त्याच्या नातलगाला आरोपी करून मोठी कारवाई झाल्याचे चित्र उभे करण्यात आल्याचा आरोपही शहरात जोर धरत आहे. या सर्व चर्चांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर अशीही चर्चा रंगू लागली आहे की, कळंब शहरात ड्रग्जचा पुरवठा कोण करत आहे, त्याचे ग्राहक कोण आहेत, कोणत्या माध्यमातून हे जाळे कार्यरत आहे आणि त्यामागे कोणाचे संरक्षण आहे, याची माहिती अनेकांना असल्याचा दावा केला जात आहे.
अशा परिस्थितीत पोलिसांनी संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्याऐवजी किरकोळ कारवाई करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या मते, “डोंगर पोखरून उंदीर काढला” अशी परिस्थिती या कारवाईत झाली असून, मोठ्या मासळीला वाचवून लहान आरोपींवर कारवाई करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे या तपासाची निष्पक्षता आणि पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, या प्रकरणी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, छापा नेमका कुठे टाकण्यात आला, किती प्रमाणात अमली पदार्थ जप्त झाले, मुख्य संशयिताची भूमिका काय होती आणि त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली, याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
जर या चर्चांमध्ये तथ्य असेल, तर हा केवळ दोन आरोपींपुरता मर्यादित गुन्हा नसून जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मोठ्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा भाग असू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरील किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


