धाराशिवमध्ये ‘सुपारी घेऊन जाणारा आयशर टेम्पो’ गायब? पोलिसांची कमालीची गुप्तता! अफवांना उधाण…
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीतून लाखोंच्या सुपारीसह आयशर टेम्पो चोरीस गेल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे. मात्र या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी म्हणजेच २९ मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सुपारी घेऊन जाणारा टेम्पो आनंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगम हॉटेल वरुडा रोड परिसरातून अचानक बेपत्ता झाल्याची चर्चा आहे. परंतु हा टेम्पो नेमका कुठून चोरीला गेला, त्यावेळी चालक काय करत होता याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फिर्याद दाखल झाली आहे की नाही, यावरही पोलीस स्पष्ट भूमिका सांगत नसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले असल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, “खरंच टेम्पो चोरीला गेला का?” की “ही केवळ अफवा आहे?” याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आनंद नगर पोलीस ठाण्यात आणि जिल्हाभरात या घटनेची ‘खमंग चर्चा’ सुरू असून, “सुपारी कोणी घेतली?”, “लंपास कोणी केली?”, “यामागे नेमकं काय दडलंय?” असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जर ही घटना खरी असेल, तर जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः लक्ष घालून सखोल चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
भाग एक… वस्तुनिष्ठ अधिक माहितीसह भाग दोन लवकरच….

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

