आळणी प्रकरणात दोन दिवसांत दोन ठिय्या आंदोलने ग्रामीण पोलिसांच्या अपयशावर प्रश्नचिन्ह
धाराशिव | लोकविचार
आळणी गावातील वाद आता केवळ दोन गटांतील आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नसून, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. अवघ्या दोन दिवसांत एकाच प्रकरणावर दोन वेगवेगळ्या गटांनी शेकडो नागरिकांसह थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पाच-पाच तास ठिय्या आंदोलन करून न्यायाची मागणी केली.
त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यावर नागरिकांचा विश्वास कमी झाला असून न्यायासाठी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेण्याची वेळ आल्याचे चित्र दिसून येत आहे.
दिनांक ३१ जुलै रोजी आळणी येथील ग्रामस्थांनी गावातील कथित अवैध धंदे, शाळकरी मुलींना होत असलेला त्रास, गावातील गुंडगिरी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. भर पावसात मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलीस अधीक्षकांनी स्वतः खाली येऊन तक्रारी ऐकाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.
यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ ऑगस्ट रोजी लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या गटाने त्याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करत माजी सरपंच प्रमोद वीर यांच्यावर विविध गंभीर आरोप केले. अवैध धंद्यांना प्रोत्साहन, मातंग समाजाला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा कट, जातीय तेढ निर्माण करणे, विद्यार्थिनींचा वापर करून प्रशासनावर दबाव आणणे आदी आरोप आंदोलनकर्त्यांनी आपल्या निवेदनातून केले. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, या दोन्ही आंदोलनांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले असले तरी न्यायासाठी स्थानिक पोलिस ठाण्याऐवजी थेट जिल्ह्याच्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्याच्या कामकाजाबाबत आणि तक्रारी हाताळण्याच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
स्थानिक पातळीवर वेळेत संवाद, समन्वय आणि कायदेशीर कारवाई झाली असती तर शेकडो नागरिकांना वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालय गाठण्याची वेळ आली नसती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. एकाच प्रकरणात सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात आंदोलने होणे हे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनांमुळे पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात दोन्ही दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि क्यूआरटी पथकही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनावर अनावश्यक ताण निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेऊन तक्रारींची हाताळणी, नागरिकांशी संवाद आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे. तसेच अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी करून कायद्याच्या चौकटीत सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई झाल्यासच नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

