विधान परिषद निवडणुकीत महायुतीला धक्का? नाराज मतदार, अंतर्गत धुसफूस आणि वाढलेले टेन्शन; बसवराज पाटील यांचे गणित बिघडणार की महेश देशमुखांना लाभ होणार?
धाराशिव लोकविचार
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतदानाच्या दिवशीच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात विविध घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय रणनीती आखण्यात आल्याचे दिसून आले.
मतदान फुटू नये आणि सर्व मतदार एकसंघ राहावेत यासाठी महायुतीच्या नगरसेवकांना तीन दिवसांपूर्वी एका ठिकाणी नेऊन एकत्र ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.मात्र मतदानाच्या दिवशी नगरसेवकांना परत आणण्यात आल्यानंतर अनेक नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या उमेदवारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे अनेक मतदारांमध्ये (नगरसेवक) असंतोष निर्माण झाला असून त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात अंतर्गत धुसफूस वाढल्याची चर्चा सुरू आहे.दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडींना वेग आला असून काही मतदारांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न झाल्याच्याही चर्चा आहेत.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, काही मतदारांशी संपर्क साधून त्यांचे समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मतदानाच्या आदल्या दिवशी धाराशिव शहरातील एका प्रमुख सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत महाविकास आघाडीच्या मतदारांशी (नगरसेवक) संपर्क साधण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मतदारांना मनधरणीच्या उद्देशाने तुटपुंज्या आर्थिक स्वरूपाचे प्रलोभन देण्यात आल्याच्या चर्चाही सुरू आहेत. तथापि, या चर्चांना कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नसून संबंधितांकडूनही याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हीच परिस्थिती संपूर्ण उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात असल्याचे बोलले जात आहे. अनेक मतदारांना विश्वासात घेण्यात आले नसल्याची भावना निर्माण झाल्यामुळे काही ठिकाणी नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महायुतीच्या गोटात अस्वस्थता वाढली असून स्थानिक नेत्यांचे टेन्शनही वाढल्याची चर्चा आहे.महायुतीच्या नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांमध्ये उमेदवारांविषयी नाराजी असल्याचे बोलले जात असून त्याचा थेट परिणाम मतदानावर होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात मात्र या परिस्थितीकडे आशेने पाहिले जात आहे. महायुतीतील नाराजी आणि संभाव्य क्रॉस व्होटिंगचा फायदा काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना होऊ शकतो का, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा रंगली आहे.भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बसवराज पाटील यांच्याकडे विजयाचे पारडे झुकलेले मानले जात असले तरी स्थानिक पातळीवरील नाराजी, मतदारांमधील अस्वस्थता आणि अंतर्गत धुसफूस यामुळे निवडणुकीचे चित्र शेवटच्या क्षणापर्यंत बदलू शकते, असे जाणकारांचे मत आहे. स्पष्ट बहुमताचे गणित दिसत असतानाही नाराज मतदारांचा फटका बसवराज पाटील यांना बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेत नेमके कोणते राजकीय समीकरण आकार घेते, महायुतीचे गणित कायम राहते की महाविकास आघाडीला अनपेक्षित लाभ होतो, आणि निकालात कोणता राजकीय चमत्कार घडतो, याकडे संपूर्ण उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


