कर्नाटकातून लातूरकडे निघालेला आयशर टेम्पो धाराशिवकडेच का वळला? 66 लाखांच्या सुपारी प्रकरणात संशय अधिक गडद!
टेम्पो सापडूनही माहिती गुप्त चालकावर संशय, ट्रान्सपोर्ट कंपनी आक्रमक – पोलीस भूमिकेवर प्रश्नचिन्ह
धाराशिव | लोकमदत न्यूज
66 लाखांच्या सुपारीसह टेम्पो चोरी प्रकरणात आता नवे धक्कादायक पैलू समोर येत असून, संपूर्ण घटनेभोवती संशयाचे सावट अधिक गडद होत चालले आहे. कर्नाटकातील काऊ पुतूर आणि केरळमधील कासारगोड येथील डेपोमधून इंडोआर्या सेंट्रल ट्रान्सपोर्ट लिमिटेडमार्फत सुपारी घेऊन लातूरकडे निघालेला टेम्पो धाराशिवकडे का वळविण्यात आला, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेम्पोला कर्नाटक ते लातूर दरम्यान बसवकल्याण–निलंगा–औसा किंवा उमरगा–औसा असा सरळ मार्ग उपलब्ध असताना, तो धाराशिव शहरात कसा पोहोचला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे चालकाचे मूळ गाव धाराशिवमध्येच असताना, घरापासून अवघ्या 1 ते 1.5 किमी अंतरावर असलेल्या हॉटेलसमोर वाहन उभे करण्यामागचा हेतू काय, यावरही संशय व्यक्त केला जात आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, हा टेम्पो गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात असल्याची माहिती मिळत असूनही, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. टेम्पो नेमका कुठे सापडला, त्यातील सुपारीपैकी किती माल शाबूत आहे, किती चोरीला गेला, आणि तो कुठे व कोणी विकला याबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप मौन पाळले गेले आहे.
या संदर्भात आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांनी पोलिस भरती बंदोबस्तात आहे उद्या सविस्तर माहिती देतो अशी माहिती दिली.
दरम्यान, ही बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून आनंदनगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले असून, त्यांनी चालकावर संशय व्यक्त करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नसल्याने ते हतबल झालेले दिसत आहेत.
ट्रान्सपोर्ट कंपनीच्या प्रतिनिधींनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, काही लोकांना अभय देण्यासाठीच सदरील गुन्हा विशिष्ट पद्धतीने नोंदवण्यात आला असावा. त्यामुळे ते सोमवारी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमदत न्यूज’शी बोलताना सांगितले.
एकूणच, 66 लाखांच्या या प्रकरणात अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले असून, चोरी की बनाव याबाबत संशय अधिकच बळावत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्वतः लक्ष घालून निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा अशा घटनांमुळे पोलिसांवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भाग तीन…. अधिक वस्तुनिष्ठ माहितीसह भाग चार लवकरच
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786


