आता बोंबला ! सत्ताधाऱ्यांची नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यास टाळाटाळ.! शहरातील विकास कामांच्या नावाने चांगभलं !
धाराशिव – लोकमदत न्यूज
कुरघोडीचे राजकारण आणि विकासाला खोडा हे धाराशिव शहराचे समीकरण बनलेले आहे. या प्रकारामुळे अगोदरच धाराशिव शहराचा आणि विकास कामांचा खेळ खंडोबा झालेला आहे. पूर्वीचे सत्ताधारी काम करत नसल्याचा आरडाओरड करत त्यांच्या नावाने बोंबाबोंब केली जात होती. सत्ता बदल होऊन दीड महिन्याचा कालावधी गाठत आला आहे. आमच्या हाती सत्ता द्या, आम्ही लागलीच विकास कामांना प्रारंभ करणार असल्याचा डांगोरा पिटला जात होता. विशेष म्हणजे विकास कामे करण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसाधारण सभा घेणे कायद्याने अनिवार्य आणि बंधनकारक आहे. मात्र, ती सभा घेण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या व्युहरचनेतून फुरसत नाही. त्यामुळे त्या सभेत कोणते विषय घ्यायचे ? हे ठरवता आलेले नाही. ती पहिलीच सर्वसाधारण सभा अद्यापपर्यंत न घेतल्यामुळे शहरातील कोणत्याच विकास कामांना प्रारंभ करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश गल्ल्यांसह काही रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याचे ढिगारे व अनेक भागातील तुंबलेल्या नालीतील घाण पाण्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष व विषय समिती सभापती यांनी आपल्या खुर्चीवर बसण्यात व घेतलेले सर्वसिधारण…सभा…न घेता…’पद’….मिरविण्यात धन्यता मानली असल्यामुळे शहरवासियांमध्ये सत्ताधाऱ्या विरोधात तीव्र असंतोष खदखदत असून बोंबाबोंब मारण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या चार वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्यामुळे नगर परिषदेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून चालविला जात होता. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांचा प्रश्न तसाच प्रलंबित धुळखात पडला होता. तर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले होते. मात्र, या कामांवरुन सत्ताधारी व विरोधक यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप करण्यासह रस्त्यावर रंगलेला कलगीतुरा शहरवासियांना याच देही याची डोळा पहायला मिळाला. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी शिवसेना (ठाकरे) च्या कारभाऱ्यावर बिनकामाचे कारभारी असे म्हणत सातत्याने ओरड केली जायची. शहरातील अस्वच्छता व पसरलेली दुर्गंधी, उखडलेले रस्ते, पिण्याचे पाणी, कचरा डेपोची दुर्गंधी, ओसाड पडलेले बागबगीचे यासह इतर मुद्द्यावरून त्यांना टार्गेट केला जात होते. तसेच शहरातील सर्व समस्या सोडविण्यामध्ये ते कसे अकार्यक्षम व अक्षम्य असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगर परिषदेची बहुमताने एकहाती सत्ता आलेली आहे. दि.२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सत्तेची खुर्ची भाजपाच्या हातात गेली असून त्यांनी सत्तेची सूत्रे स्विकारल्यापासून शहरातील विकास कामांबाबत अद्यापपर्यंत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेतलेली नाही. ही सभा नगराध्यक्ष पदाचा कारभार स्विकारल्यापासून २५ दिवसांच्या आत घेणे बंधनकारक व अत्यावश्यक आहे. तसा शासना नियम आहे. Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965
पहिली बैठक (General Meeting)
कायद्यानुसार, नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीनंतर सर्वसाधारण सभा (जीबीची पहिली बैठक) निवडणुकीचा निकाल आणि सदस्यांची नावे अधिकृत गझेटमध्ये प्रकाशित केल्यापासून २५ दिवसांच्या आत होणे आवश्यक आहे. ही तरतूद Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act मध्ये आहे. Indian Kanoon
याचा अर्थ निकाल जाहीर झाल्यावर आणि सदस्यांची नावे अधिकृत पद्धतीने प्रसिद्ध झाल्यावर, त्या दिवशीपासून अधिकतम २५ दिवसांत पहिली जीबी बैठक आयोजित करावी, असे स्पष्ट केले आहे. ही सर्वसाधारण सभा घेऊन कोणती कामे करायची ? ती कशी करायची ? आणि त्यासाठी आवश्यक असलेला निधी कोणत्या योजनेतून उपलब्ध करायचा ? त्याबाबत सत्ताधारी व विरोधक यांच्या समन्वयातून सखोल चर्चा करुन ती निश्चित करुन मंजूर केली जातात. मात्र, सत्ताधाऱ्यांचे मुख्य मार्गदर्शक व शहराच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी हेच सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी गुंतले आहेत. त्यामुळे त्यांना शहरातील विकास कामांचे नियोजन करणे व ती करण्यासाठी फुरसत मिळत नाही. त्या निवडणुकीची जबाबदारी पार पाडणे हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे शहरवासियांना वाऱ्यांवर सोडून दिले आहे का ? असा प्रश्न शहरवासीय विचारु लागले आहेत. त्यामुळे धाराशिव नगर परिषदेची पहिली वाहिली सर्वसाधारण सभा केंव्हा घेणार ? आणि शहरातील समस्या सोडविण्यासाठी केंव्हा व कोणता मुहूर्त सापडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
