नियमित पाणीपुरवठ्यासाठी सभापती विलास (बापू) लोंढे यांचे सकारात्मक पाऊल पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वात प्रशासन सक्रिय दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव नगर परिषदेत पाणीपुरवठा सभापती पदाचा कार्यभार स्वीकारताच विलास (बापू) लोंढे यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या असून, नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासनही या कामासाठी सक्रिय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याच्या विविध समस्या, अडचणी व उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सध्या धाराशिव शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत असून विविध तांत्रिक अडचणींना तोंड देत शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वीज विभागातील तांत्रिक बिघाड, रस्त्यांवरील सुरू असलेली विकासकामे तसेच पाइपलाईन फुटण्याच्या घटनांमुळे काही वेळा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याची माहिती बैठकीत समोर आली. या सर्व बाबींचा सखोल आढावा घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सभापती विलास (बापू) लोंढे यांनी दिल्या.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या सहकार्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी सभापती विलास लोंढे यांनी स्पष्ट केले. शहरात दोन ते तीन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही सभापती लोंढे यांनी दिली.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची टंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करणाऱ्या वॉलमन यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली असून त्यांनी आपल्या विभागातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या वेळेबाबत स्पष्ट माहिती द्यावी, पाणी कधी येणार याची पूर्वकल्पना नागरिकांना द्यावी, तसेच शक्यतो दिवसाच्या वेळेतच पाणीपुरवठा करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या. नागरिकांशी आपुलकीने संवाद साधून पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर देण्याचे निर्देशही सभापती लोंढे यांनी दिले.
शहरात सुरू असलेली अटल अमृत २ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर धाराशिवकरांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, सहाय्यक अभियंता रोहित मुंडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वॉलमन उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
