बस स्थानकामध्ये एनसीएमसी कार्ड वितरणात शिस्त; नागरिकांची आर्थिक पिळवणुकीला बसला चाप!
लोकविचारच्या सातत्यपूर्ण वृत्तांची दखल; विभाग नियंत्रकांच्या आदेशानंतर एजन्सीवर कडक देखरेख, नियमानुसार शुल्क आकारणी सुरू!
धाराशिव | लोकविचार
धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकातील एनसीएमसी कार्ड केंद्रावर नागरिकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक, अतिरिक्त शुल्काची आकारणी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांशी गैरवर्तन यासंदर्भात लोकविचारने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून हा गंभीर प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. या वृत्तांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गंभीर दखल घेत तातडीने सुधारात्मक पावले उचलल्याने आता एनसीएमसी कार्ड वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
लोकविचारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर विभाग नियंत्रकांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत कार्ड वितरण करणाऱ्या एजन्सीच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त रक्कम आकारली जाणार नाही, नियमानुसारच शुल्क घेतले जाईल आणि सर्व प्रवाशांना सन्मानपूर्वक सेवा दिली जाईल, याची खातरजमा करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या आदेशानंतर संबंधित एजन्सीकडून आता नियमानुसारच शुल्क आकारले जात असून संपूर्ण प्रक्रियेवर एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची विशेष देखरेख ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तक्रारींना मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, 15 जून रोजी विभाग नियंत्रकांनी अचानक एनसीएमसी कार्ड केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कार्ड वितरणाची प्रक्रिया, नागरिकांना दिली जाणारी सेवा आणि शुल्क आकारणीची माहिती त्यांनी घेतली. केंद्रावर शिस्तबद्ध पद्धतीने कार्ड वितरण सुरू असल्याचे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आल्याचे पाहून विभाग नियंत्रकांनी समाधान व्यक्त केले.
प्रशासनाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय एनसीएमसी कार्ड उपलब्ध होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सातत्याने मांडून प्रशासनाला जागे करणाऱ्या लोकविचारच्या भूमिकेचेही अनेकांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकारितेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या लोकविचारच्या वृत्तांची ही सकारात्मक परिणामकारकता असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” या ब्रीदवाक्याला साजेशी भूमिका घेत लोकविचारने मांडलेल्या प्रश्नाची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


