66 लाखांच्या सुपारी प्रकरणात मोठी कारवाई 5.8 टन सुपारीसह आयशर टेम्पो जप्त, एक आरोपी ताब्यात
धाराशिवकडे वळलेल्या टेम्पोचा गूढ कायम टेम्पो चालकाचा मोबाईल बंद?
धाराशिव | लोकमदत न्यूज
66 लाखांच्या सुपारीसह बेपत्ता झालेल्या आयशर टेम्पो प्रकरणात अखेर मोठी कारवाई करत आनंदनगर पोलिसांनी तब्बल 5 टन 800 किलो सुपारीसह टेम्पो जप्त केला असून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. तौसिफ मंजूर शेख (रा. धाराशिव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे काही दिवसांपासून गाजत असलेल्या या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी पहाटे धाराशिवहून वैरागकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका पुलाजवळ संशयास्पदरीत्या उभा असलेला आयशर टेम्पो आढळून आला. तातडीने तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी आढळून आली. चौकशीअंती हीच सुपारी काही दिवसांपूर्वी गायब झालेल्या मालातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोसह सुपारी जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टेम्पो चालक याला अधिक चौकशीसाठी फोन केला असता त्याचा मोबाईल बंद आहे. कर्नाटकातून लातूरकडे निघालेला टेम्पो सरळ मार्ग सोडून धाराशिवकडे का वळला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. बसवकल्याण–निलंगा–औसा किंवा उमरगा–औसा असा सोपा मार्ग उपलब्ध असताना वाहन धाराशिव शहरात येणे, तसेच चालकाचे घर जवळ असताना हॉटेलसमोर टेम्पो उभा करण्यामागील हेतू संशयास्पद मानला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पूर्वनियोजित कटाची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सुपारीपैकी काही माल विकला गेला का, कोणत्या ठिकाणी विक्री झाली, तसेच या संपूर्ण व्यवहारामागे कोणता मास्टरमाइंड आहे, याचा शोध घेण्यावर पोलिसांचा भर आहे. ट्रान्सपोर्ट मालक सोहन किसनलाल यांचा जबाब नोंदवण्यात आला असून सुपारी वाहतुकीची संपूर्ण साखळी तपासली जात आहे.
लोकमदत न्यूजने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी गती घेत अल्पावधीत मोठी कारवाई करून मोठ्या प्रमाणात सुपारी जप्त केली आहे, ही बाब उल्लेखनीय मानली जात आहे. आनंदनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
मात्र, या प्रकरणामुळे सुपारी वाहतूक साखळीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माल देणारे, घेणारे, चालक व इतर संबंधित यांच्यातील संभाव्य संगनमताचीही चौकशी सुरू असून इतक्या मोठ्या प्रमाणात माल गायब होण्यासाठी आतल्या गोटातील हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, सुपारीसह टेम्पो जप्त होऊनही या प्रकरणातील अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून चालकाचा मोबाईल बंद असल्याने संशय कायम आहे. या 66 लाखांच्या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा उलगडा आता पुढील पोलिस तपासातूनच होणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


