कळंब ड्रग्ज प्रकरणात सहा दिवसांनी तिसरी कारवाई; ‘मुख्य मासा’ अजूनही मोकाट? स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह!
लोकविचार | कळंब
कळंब शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, ४ ऑगस्ट रोजी दोन आरोपींना अटक झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी पोलिसांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. १० ऑगस्ट रोजी लखन गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या कारवाईनंतरही या प्रकरणातील अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरितच आहेत.
४ ऑगस्ट रोजी ‘लोकविचार’ने कळंबमधील एमडी ड्रग्ज कारवाईचा पर्दाफाश झाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तसेच या प्रकरणाच्या तपासावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ११.२१ ग्रॅम एमडी जप्त केले आणि दोन संशयितांना अटक केली होती. मात्र, त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून पुढील कारवाईसाठी तब्बल सहा दिवसांचा कालावधी लागल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
आता तिसऱ्या संशयिताला अटक झाल्याने हे प्रकरण खरोखर मोठ्या ड्रग्ज नेटवर्कच्या मुळापर्यंत जाणार आहे की केवळ वेळ मारून नेण्यासाठीची कारवाई ठरणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्य सूत्रधारापर्यंत तपास पोहोचणार का, ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता, या साखळीमागे आणखी किती जण आहेत आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे कुठे जातात, याची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे.
दरम्यान, कळंब येथील भाजपा नगरसेवक शितल चोंदे यांनीही कळंब पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पोलीस अधीक्षकांकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कळंबमध्ये ड्रग्जचे जाळे किती खोल?
कळंबसारख्या शहरात अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या चर्चेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज पोहोचत असल्याच्या तक्रारी पालकांकडून व्यक्त होत आहेत. मात्र, विक्रेत्यांच्या दहशतीमुळे अनेकजण उघडपणे पुढे येण्यास धजावत नसल्याचीही चर्चा आहे.
त्यामुळे केवळ दोन तीन आरोपींवर कारवाई करून प्रकरण संपवण्याऐवजी ड्रग्जच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेणे आवश्यक आहे. ४ ऑगस्ट रोजी दोन आरोपी आणि १० ऑगस्ट रोजी आणखी एक आरोपी अशा कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे ही साखळी आणखी वाढणार की येथेच थांबणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘लोकविचार’ने या प्रकरणावर सातत्याने प्रश्न उपस्थित करून तपास यंत्रणांचे लक्ष वेधले होते, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास कळंब ठाणे प्रभारी अधिकारी यांच्याकडील काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवून ड्रग्जच्या मुळापर्यंत पोहोचण्याची ठोस कारवाई करावी, अशी मागणी देखील नगरसेवक चोंदे यांनी केली आहे.
तिसरा आरोपी पकडला; पण ‘मुख्य मासा’ कोण?
या प्रश्नाचे उत्तर तपासातून समोर येणेच या कारवाईची खरी कसोटी ठरणार आहे.
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद | 083900 88786
#ड्रग्स #अमली_पदार्थ #पोलिस #Crime #धाराशिव #कळंब











