नराधमाचा काळजाला पीळ पाडणारा क्रूरपणा; नसरापूरच्या चिमुरडीसाठी नळदुर्गमध्ये जनक्षोभ!
ब्राह्मण समाज आणि पेशवा युवा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे: ‘त्या’ राक्षसाला तात्काळ फासावर लटकवा!
नळदुर्ग (प्रतिनिधी): अझहर शेख,
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या नृशंस घटनेचे तीव्र पडसाद आता नळदुर्गमध्ये उमटले असून, दोषी नराधमाला कोणत्याही परिस्थितीत माफी न देता,तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी आक्रमक मागणी ब्राह्मण समाज संघटना व पेशवा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भात पोलीस प्रशासनामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर निवेदन धाडण्यात आले असून, समाजात निर्माण झालेला तीव्र संताप या निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.नसरापूरची घटना ही केवळ गुन्हा नसून माणुसकीला लागलेला कलंक आहे. एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा वासनांध नराधमाने बळी घेतला. विशेष म्हणजे, संबंधित नराधम हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे समोर येत आहे. अशा राक्षसी वृत्तीच्या गुन्हेगारांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा. गुन्हेगाराची क्रूरता पाहता त्याला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा व्हावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल अशी कठोर कारवाई करावी.अशा वासनांध राक्षसी वृत्ती वेळीच ठेचल्या गेल्या पाहिजेत. एका निष्पाप बालिकेची हत्या ही संपूर्ण समाजाची हानी आहे. या नराधमाला कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय जनक्षोभ शांत होणार नाही.निवेदन सादर करताना नळदुर्गमधील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रामुख्याने,प्रमोद कुलकर्णी,तालुकाध्यक्ष, पेशवा युवा संघटना, मुकुंद नाईक,अध्यक्ष, ब्राह्मण समाज संघटना, आकाश कुलकर्णी,नगरसेवक, संदीप वैद्य,सचिव, प्रदीप ग्रामोपाध्ये उपाध्यक्ष, तसेच उमेश नाईक, सनी भूमकर, गजानन कुलकर्णी, मयुर भूमकर, नितीन कुलकर्णी व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राज्य सरकार आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लागले असून, या नराधमाला कधी फासावर लटकवले जाते, याची प्रतीक्षा सर्वत्र केली जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


