‘माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम; अहवाल ‘गुळगुळीत’ आल्यास आंदोलन अधिक तीव्र!
धाराशिव | लोकविचार
‘माऊली इंटरप्राईजेस’ आणि ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने कथित बोगस देयके व शासकीय निधीच्या गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या प्रकरणाने आता पुन्हा वेग घेतला आहे. तक्रारदार सुरज महादेव माळी यांनी केलेल्या आमरण उपोषणानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन देत ३१ ऑगस्टपर्यंत चौकशीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर माळी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
मात्र आता ३१ ऑगस्टला प्रशासनाचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाबाबत संबंधित कार्यालयाचे कार्यकारी अभियंता डी. व्ही. खट्टे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रकरण २०२१ मधील असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने उपलब्ध कागदपत्रे व तक्रारीतील मुद्द्यांचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, ३१ ऑगस्टपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकारी पुढील निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेमका आरोप काय?
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ‘माऊली इंटरप्राईजेस’च्या नावाने प्रिंटर टोनर खरेदीसाठी लाखो रुपयांची देयके, तर ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने वाहन वापराच्या नोंदींवर आधारित आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय आहे. एकाच वाहनाचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर दाखवणे, प्रत्यक्ष अंतरापेक्षा अधिक किलोमीटर नोंदवणे, तसेच स्वाक्षरी व शिक्क्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मात्र या सर्व आरोपांची सत्यता चौकशीअंतीच स्पष्ट होणार असून, दोष निश्चित करण्यापूर्वी अधिकृत अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
३१ ऑगस्टनंतर काय?
आंदोलन स्थगित करताना प्रशासनाच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवला असला तरी अहवालात जर वस्तुस्थिती दडपण्याचा किंवा प्रकरणाला सौम्य स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा तक्रारदाराने दिला आहे.
यामुळे आता प्रशासनासमोर दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत—चौकशी कितपत निष्पक्ष होते आणि ३१ ऑगस्टला वरिष्ठ कार्यालयाकडे नेमका कोणता अहवाल सादर होतो? या अहवालातून आरोपांमागील वस्तुस्थिती समोर येते का, याकडे धाराशिवचे लक्ष लागले आहे.
अधिकाऱ्यांची भूमिका | ‘३१ ऑगस्टपर्यंत अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे’
कार्यकारी अभियंता डी. व्ही. खट्टे यांनी सांगितले की, ‘सदर प्रकरण २०२१ मधील आहे. त्याअनुषंगाने अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३१ ऑगस्टपर्यंत हा अहवाल आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाईल. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतील.’
तक्रारदार माळींची भूमिका | ‘अहवाल गुळगुळीत दिला तर लढा तीव्र करणार!’
सुरज माळी म्हणाले, ‘सदर कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते योग्य अहवाल सादर करतील, असा मला विश्वास आहे. मात्र अहवाल गुळगुळीत दिला तर माझी पुढील लढाई यापेक्षाही तीव्र असेल. माझ्याकडे या प्रकरणासंदर्भात आणखी पुरावे आहेत. तसेच इतर कथित गैरप्रकारांचेही पुरावे माझ्याकडे आहेत. ते शासन स्तरावर देण्यासोबतच गरज पडल्यास न्यायालयातही दाद मागणार आहे. दोषी अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबतच कार्यालयाबाहेरील दलाल संबंधित बँक / पतसंस्था यांची चौकशी करून कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील.’
दरम्यान, प्रशासनाच्या चौकशीचा अंतिम अहवाल आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय यावरच आता या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे.
लोकविचार “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”संपादक : अमजद सय्यद | 083900 083900 88786











