आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
धाराशिवमध्ये अवतरले ‘पिवळे वादळ’; जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय संविधानच्या घोषणांनी दुमदुमला परिसर
धाराशिव लोकविचार
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ-ब-क-ड पद्धतीने उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने गुरुवारी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, युवक व युवती या मोर्चात सहभागी झाले होते. ‘जय लहुजी’, ‘जय अण्णाभाऊ’, ‘जय भीम’, ‘जय संविधान’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ आणि ‘आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. मोर्चातील सहभागींच्या पिवळ्या फेटे व झेंड्यांमुळे धाराशिवमध्ये तब्बल पाच तास ‘पिवळे वादळ’ घोंगावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून दुपारी पावणे दोन वाजता मोर्चास सुरुवात झाली. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मोर्चेकऱ्यांनी मार्गक्रमण केले. देशपांडे स्टॅण्ड, ताजमहल टॉकीज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा पुन्हा शिवाजी महाराज चौकातून लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिस्थळाकडे गेला. तेथे अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. प्रारंभी भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दत्ता पेठे यांनी सर्व वक्त्यांनी कार्यक्रमाची आचारसंहिता पाळावी, असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास सर्व मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थिनी साक्षी कसबे हिने मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अमित गोरखे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिल्याची आठवण करून दिली. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह पाच राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली असताना महाराष्ट्र सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ पोटजातींना आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळण्यासाठी अ-ब-क-ड पद्धतीने वर्गीकरण आवश्यक असल्याचे सांगताना गोरखे म्हणाले की, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, मादिगा यांच्यासह विविध घटकांना आरक्षणाचा समान लाभ मिळण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नसून वंचित समाजाच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे. सरकारने उपवर्गीकरण त्वरित लागू करावे, अन्यथा वंचित समाजाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
वक्त्यांनी सांगितले की, अनुसूचित जातींमधील ५८ घटकांना आरक्षणाचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला २५ महिने पूर्ण होत आले तरी महाराष्ट्रात अंमलबजावणी झालेली नाही. इतर राज्यांनी पुढाकार घेतला असताना महाराष्ट्र सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
मोर्चादरम्यान वक्त्यांनी स्पष्ट केले की, उपवर्गीकरणासाठीचा हा लढा कोणत्याही समाजाविरोधात नसून सरकारकडे न्याय्य हक्कासाठी केलेली मागणी आहे. मातंग समाज आणि त्यांच्या महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्ये टाळावीत तसेच समाजाला सोबत घेऊन विकासाच्या प्रवाहात सहभागी करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या विराट मोर्चात आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, अजिंक्य चांदणे, अभिमान पेठे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, प्रा. डॉ. अंकुश गोतावळे, राजेश घोडे, प्रा. भगवानराव वाघमोडे, गणपत भिसे, संतोष हनुमंते, संजय ठोकळे, नगीना कांबळे, युवराज शिंदे, प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे, सचिन साठे, कैलास खंदारे, रामचंद्र वाडेकर, नगरसेवक विलास लोंढे, दत्ता पेठे, संतोष मोरे,यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











