तुळजापूरला आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कळंबच्या ड्रग्ज प्रकरणात गप्प का?
तुळजापूरला मोठे रॅकेट उघडले, कळंबला फक्त दोघांवर कारवाई? ‘ड्रग्ज’ प्रकरणात लोकप्रतिनिधींची चुप्पी का?
११.२१ ग्रॅम एमडी जप्तीनंतर संशयाचे धुके; मुख्य सूत्रधार आणि ड्रग्जची मोठी साखळी तपासाच्या कक्षेत येणार का? सीडीआर तपासणीची मागणी; कळंबकर लोकचळवळीच्या तयारीत
कळंब | लोकविचार | विशेष प्रतिनिधी
कळंब शहरातील एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणाने आता केवळ पोलिसांच्या कारवाईवरच नव्हे, तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पोलिसांनी ११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून दोन संशयितांवर कारवाई केली असली, तरी एवढ्या मोठ्या चर्चेचा विषय ठरलेल्या ड्रग्जच्या कथित जाळ्याचा तपास केवळ दोन आरोपी आणि ११.२१ ग्रॅम मुद्देमालापुरता मर्यादित राहणार का, असा संतप्त सवाल आता कळंबकरांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून आंदोलने, मोर्चे, तक्रारी तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमातूनही हा प्रश्न मोठ्या ताकदीने मांडला होता. त्या प्रकरणाच्या तपासात मोठ्या प्रमाणावर आरोपींवर कारवाई होत ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, कळंबमधील प्रकरणात सध्या केवळ दोन आरोपी आणि ११.२१ ग्रॅम एमडी एवढ्याच कारवाईवर प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे का, असा गंभीर आरोप आणि संशय कळंब शहरातून व्यक्त केला जात आहे.
तुळजापूरला आवाज उठला, कळंबला चुप्पी का?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या वेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली होती. रस्त्यावर उतरून आंदोलनापासून ते विधिमंडळ आणि संसदेत प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत विविध पातळ्यांवर आवाज उठविण्यात आला होता. मात्र, कळंबमध्ये एमडी ड्रग्जचा साठा पकडला गेल्यानंतर अद्याप जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींनी याबाबत तितक्याच तीव्रतेने भूमिका घेतलेली का दिसत नाही?
“तुळजापूरला वेगळा न्याय आणि कळंबला चुप्पी का?” असा सवाल आता कळंबकरांकडून केला जात आहे.
कळंब शहरातील युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचा वाढता प्रभाव असल्याच्या चर्चा यापूर्वीपासूनच होत आहेत. शाळा आणि महाविद्यालयातील काही विद्यार्थीही या व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे. त्यामुळे पालकवर्गातही चिंतेचे वातावरण असून, ड्रग्जच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
फक्त दोन आरोपींवर कारवाईने तपास संपणार का?
पोलिसांच्या कारवाईत निखिल जाधव आणि अरविंद कांबळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २९ पारदर्शक पुड्यांमध्ये असलेले ११.२१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, या दोघांपर्यंतच ड्रग्जचा पुरवठा मर्यादित आहे का? त्यांना एमडी कोण पुरवत होते? पैसा कुठून येत होता? माल कुठून येत होता? ग्राहक कोण आहेत? या व्यवहारामागे आणखी किती जण आहेत? आणि या साखळीतील मुख्य सूत्रधार कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे.
याच पार्श्वभूमीवर संशयित आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे तपासून संपूर्ण नेटवर्कचा शोध घ्यावा, अशी मागणी आता होत आहे.
मोठी साखळी आहे का? मुख्य सूत्रधारापर्यंत तपास पोहोचणार का?
त्यामुळे आता पोलिसांसमोर केवळ दोन आरोपींवर कारवाई करण्याचे आव्हान नसून, या प्रकरणामागे मोठे नेटवर्क असल्यास ते उघड करण्याचे आव्हान आहे.
कळंब शहरात होत असलेल्या विविध चर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडल्याचा आणि अधिकृत कारवाईत कमी प्रमाण दाखविल्याचा आरोप केला जात आहे. तसेच कथित मुख्य सूत्रधाराला अभय मिळाल्याच्या चर्चाही सुरू आहेत. या आरोपांना अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र अशा चर्चांना उधाण येत असेल, तर पोलीस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
एसपी स्वतः तपासात लक्ष घालणार का?
या संपूर्ण प्रकरणामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षक स्वतः तपासाचा आढावा घेणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तसेच, कळंब ड्रग्ज प्रकरणाबाबत जिल्हाभरात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन कारवाईची संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही आता पुढे येत आहे. किती मुद्देमाल जप्त झाला? जप्त केलेल्या पदार्थाची तपासणी कशी झाली? आरोपींच्या संपर्कातील व्यक्ती कोण आहेत? ड्रग्जचा पुरवठा कुठून झाला? यामध्ये आणखी आरोपी आहेत का? तपास कोणत्या दिशेने सुरू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी स्पष्ट करणे अपेक्षित आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही कळंबमध्ये ड्रग्ज कसे आले?
धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज रॅकेट मुळासकट उखडून टाकण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला बैठकीत दिले होते. अशा परिस्थितीत कळंबसारख्या शहरात एमडी ड्रग्जचा साठा आणि विक्रीचे प्रकरण समोर आलेच कसे? याचाही तपास होणे गरजेचे आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने ड्रग्जविरोधात कोणत्या उपाययोजना केल्या? कळंब शहरातील शाळा-महाविद्यालय परिसर, संशयित ठिकाणे आणि ड्रग्जच्या संभाव्य पुरवठा साखळीवर किती लक्ष ठेवण्यात आले? स्थानिक गुप्तचर यंत्रणेला या व्यवहाराची माहिती का मिळाली नाही? हे प्रश्नही आता महत्त्वाचे ठरत आहेत.
लोकप्रतिनिधी गप्प! आता कळंबकरच रस्त्यावर उतरणार?
कळंब शहरातील ड्रग्जच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा पालक आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मात्र अपेक्षित पातळीवर आवाज उठत नसल्याची भावना निर्माण होत असून आता लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून कळंबकर स्वतः एकत्र येऊन लोकचळवळ उभी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी, मुख्य सूत्रधाराचा शोध, ड्रग्जच्या पुरवठा साखळीचा पर्दाफाश आणि दोषींवर कठोर कारवाई यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी नागरिकांकडून केली जात असल्याचे बोलले जात आहे.
आता खरी कसोटी पोलिसांच्या तपासाची!
कळंबमधील एमडी प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई निश्चितच महत्त्वाची आहे. मात्र ही कारवाई सुरुवात आहे की शेवट? हा खरा प्रश्न आहे.
जर या प्रकरणामागे मोठी साखळी असेल तर ती उघड होणे आवश्यक आहे. मुख्य सूत्रधार कोण असेल, त्याच्यापर्यंत तपास पोहोचणे गरजेचे आहे. संशयितांचे सीडीआर, आर्थिक व्यवहार आणि संपर्क तपासले गेले तर अनेक धागेदोरे हाती लागू शकतात. मात्र तपास केवळ दोन आरोपी आणि ११.२१ ग्रॅम एमडीपुरता मर्यादित राहिला, तर नागरिकांच्या मनातील संशय अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
म्हणूनच आता सवाल एकच—कळंबच्या ड्रग्ज रॅकेट
ची मुळे पोलीस प्रशासन खरोखर उखडून टाकणार का, की ११.२१ ग्रॅम एमडी आणि दोन आरोपींवरच प्रकरणाचा शेवट होणार?
या प्रश्नाचे उत्तर आता जिल्हा पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि तपास यंत्रणा यांना द्यावे लागणार आहे.
लोकविचार – सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद
मो. 083900 88786


