“२० ऑगस्टला धाराशिवात मातंग समाजाचा एल्गार! उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी लाखोंचा महामोर्चा; सरकारला थेट इशारा”
धाराशिव लोकविचार
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे आणि मातंग समाजाला न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या २० ऑगस्ट रोजी धाराशिवमध्ये लाखोंच्या उपस्थितीत महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मातंग समाज समन्वय समितीने केली आहे. राज्यभरातील मातंग समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असून, हा मोर्चा सरकारला जाग आणणारा आणि आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णायक ठरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समन्वय समितीचे अभिमान पेठे, प्रभाकर लोंढे, युवराज शिंदे आणि नगरसेवक विलास लोंढे, दत्ता पेठे, संतोष मोरे यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली. यावेळी बालाजी गायकवाड, शिवाजीराव गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करणारा निर्णय दिला असून, त्या निर्णयाला दोन वर्षांचा कालावधी उलटूनही राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे मातंग समाजामध्ये तीव्र नाराजी असून, सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी सांगितले की, मातंग समाजात मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित युवक-युवती आहेत. मात्र, आरक्षणाच्या लाभापासून हा समाज आजही मोठ्या प्रमाणात वंचित आहे. त्यामुळे समाजाचा अपेक्षित विकास झालेला नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातींचे अ, ब, क आणि ड अशा उपवर्गांमध्ये वर्गीकरण करून प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंजाबसह इतर अनेक राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाली, मग महाराष्ट्रातच विलंब का होत आहे? सरकार मातंग आणि बौद्ध समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
२० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता तुळजापूर नाका परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून महामोर्चाला सुरुवात होणार असून, तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला.
मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, “झोपडी ते झोपडी” जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील मातंग महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर आमदार अमित गोरखे, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार सुनील कांबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे, पीडीआयचे अजिंक्य चांदणे, डॉ. गोतावळे यांच्यासह विविध मान्यवर मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
समन्वय समितीने स्पष्ट केले की, हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून, मातंग समाजाला घटनात्मक अधिकार आणि आरक्षणातील न्याय्य वाटा मिळावा, या एकमेव मागणीसाठी आयोजित करण्यात येत आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


