‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ ‘संध्याकाळी ७ ते ९ – अभ्यासासाठी दोन तास’ उपक्रमाची राज्यभर चर्चा धाराशिव जिल्हा परिषद घडवतेय शिक्षणाची नवी लोकचळवळ
धाराशिव लोकविचार विद्यार्थ्यांमधील वाढता स्क्रीन टाईम कमी करून अभ्यासाची सवय रुजविणे, कुटुंबातील संवाद वाढविणे आणि सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेला ‘संध्याकाळी ७ ते ९ – अभ्यासासाठी दोन तास’ हा अभिनव उपक्रम आता संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिक्षणासाठी समाज एकवटल्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे.धाराशिव जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ७१२ ग्रामपंचायतींमध्ये दररोज सायंकाळी ७ वाजता भोंगा वाजवून नागरिकांना दोन तासांसाठी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करत असून, पालकही मुलांसोबत बसून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे घराघरांत शिक्षणाला प्राधान्य देणारे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या उपक्रमाला केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर पालक, शिक्षक, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांमध्ये कुटुंबांनी मोबाईलमुक्त क्षण अनुभवत त्याचे सेल्फी आणि संदेश सोशल मीडियावर शेअर केले असून, इतर गावांनाही या मोहिमेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते, भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिक्षणाला समाजाची जोड देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.’आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ या व्यापक संकल्पनेचा भाग असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय विकसित करण्याबरोबरच कुटुंबातील संवाद वाढविणे, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे अभ्यासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसू लागले आहेत.शिक्षणासाठी समाजाने एकत्र येऊन उभारलेले हे लोकचळवळीचे मॉडेल आता राज्यासाठी आदर्श ठरत असून, भविष्यात देशातील इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचा हा अभिनव प्रयोग शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविणारा उपक्रम म्हणून व्यापक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे.


