धाराशिव जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना; आरोग्य सेवांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, समन्वयपूर्ण आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आज जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या स्थापना व उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना हा केवळ औपचारिक उपक्रम नसून धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक प्रभावी, सक्षम आणि जनतेच्या अपेक्षांनुसार विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विभागांमधील समन्वय वाढविणे आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी समितीच्या प्रमुख जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकताना आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक परिणामकारक करणे, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणे या बाबींवर विशेष भर दिला.
पालकमंत्री सरनाईक यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात दवाखान्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. या सर्व कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
समितीतील सर्व सदस्य, अधिकारी आणि संबंधित विभागांनी समन्वय, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून कार्य करण्याचे आवाहन करताना धाराशिव जिल्ह्याला आरोग्य सेवांच्या क्षेत्रात राज्यातील आदर्श जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी समितीच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांचे अभिनंदन करून समितीच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही समिती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


