“आश्वासनांचा पाऊस, विकासाचा दुष्काळ! प्रभाग १२ मध्ये पावसाचे पाणी घरात.. नागरिकांचा नगरसेवकांवर अनेक गंभीर आरोप”
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील भवानी चौक, विद्यामाता शाळा परिसर, एसटी कॉलनी व परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असून, पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
परिसरातील नागरिकांनि सांगितले की या भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही प्रभावी नाली व्यवस्था नसल्याने प्रत्येक पावसात रस्ते आणि गल्लीत मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हेच पाणी अनेकांच्या घरात घुसत असल्याने नागरिकांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, उपचारासाठी अनेकांना मोठा खर्च करावा लागत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
या परिसरातील काही वयोवृद्ध नागरिक साचलेल्या पाण्यात घसरून जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. शिवाय नागरिकांनी आपापल्या घरासमोर पाणी अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेजाऱ्यांमध्ये दररोज वाद, भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी प्रभागातील भाजपचे नगरसेवक अकोसकर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, निवडणुकीनंतर एका महिन्यात नाली व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दहा महिने उलटूनही कोणतेही ठोस काम सुरू झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीत विकासाची मोठी आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात परिसरातील मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांनि सांगितले. तर स्वतः पैसे घेऊन घरात बसले आणि आता आपले बंगले बांधण्यास सुरू केले असल्याचा गंभीर आरोप देखील नागरिकांनी केला आहे.
धाराशिव नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असतानाही शहरातील स्वच्छता आणि मूलभूत सुविधा सुधारण्यात अपयश आल्याचा आरोपही नागरिकांनी केला. विशेष म्हणजे संबंधित नगरसेवक याच परिसरात वास्तव्यास असूनही स्वतःच्या परिसरातील समस्या न सुटल्याने संपूर्ण प्रभागाचा विकास कसा होणार, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
भवानी चौक ते विद्यामाता शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व्हिस रोडलगत पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळ्यांमुळे बंद झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर व घरांमध्ये साचत असून, संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे.
नागरिकांनी नगर परिषद प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ या भागाची स्वच्छता करून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी नालीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


