भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी मोठी मोहीम सुरू; मुख्याधिकारी नीता अंधारे व नगराध्यक्ष नेहा काकडे यांचा पुढाकार
नसबंदी व रॅबीज लसीकरणावर भर; नागरिकांनी पाळीव कुत्र्यांना ओळख पटवावी — प्रशासनाचे आवाहन
धाराशिव लोकविचार
धाराशिव शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी व रॅबीज लसीकरण करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, आरोग्य सभापती अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, आकोसकर, मुख्याधिकारी नीता अंधारे आणि स्वच्छता निरीक्षक तथा उपमुख्याधिकारी अभिजीत गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघात, चावण्याच्या घटना आणि रॅबीजसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.या मोहिमेसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी व लसीकरण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून संपूर्ण मोहिमेस सुमारे चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, नागरिकांनी आपली पाळीव कुत्री या मोहिमेत चुकीने पकडली जाऊ नयेत यासाठी त्यांच्या गळ्यात पट्टा किंवा ओळख चिन्ह लावणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच ज्या भागात हिंस्त्र किंवा आक्रमक कुत्र्यांची समस्या अधिक आहे, त्या ठिकाणी प्रथम कारवाई केली जाणार आहे.नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी या मोहिमेला शहराच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रमांना गती मिळत असल्याचे दिसून येत आहे.मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी घाईगडबड न करता सहकार्य करावे.” तसेच नागरिकांनी कुठेही आक्रमक किंवा त्रासदायक कुत्रे आढळल्यास 8600271732 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.एकूणच, प्रशासनाच्या या पुढाकारामुळे धाराशिव शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


