धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!
खासदार-आमदारांच्या विश्वासूंची ‘कमळ’कडे वाटचाल जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विद्यमान चार नगरसेवकांसह एकूण पाच नगरसेवक लवकरच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
हे सर्व नगरसेवक खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र, आता त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात भाजपची वाढती ताकद आणि युवा नेतृत्व म्हणून मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची आक्रमक भूमिका यामुळे हे नगरसेवक प्रभावित झाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील विकासनिधी खेचून आणण्यासाठी आणि सत्तेच्या केंद्राशी जवळीक वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या पक्षप्रवेशाची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराशी निष्ठा असलेल्या एका विश्वासू नेत्यावर सोपविण्यात आली आहे. या नेत्याने ठाकरे सेनेच्या एका नगरसेवकासोबत मुंबई येथे जाऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, पाच नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाचा प्रवेश आमदार पाटील यांनी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता उर्वरित पाचव्या नगरसेवकाची निवड कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम नाव निश्चित होताच पक्षप्रवेशाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे समजते.
या घडामोडींमुळे धाराशिवच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण निर्णायक ठरणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786
