धाराशिव, दि. २३ (अमजद सय्यद) :धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिनांक ३० मे २०२५ रोजी जिल्ह्यातील बदलीच्या स्थितीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र या आदेशानंतर काहीच दिवसांत जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली आणि त्याजागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर खोकर यांनीच कर्मचाऱ्यांचे अंतिम बदलीचे आदेश जारी केले.
या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या नवीन पदस्थानी तात्काळ हजर होणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यातील काही कर्मचारी आजही जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे कर्मचारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांना सोडण्यात आले नसल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे.
याबाबतचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी थेट उपस्थित केला. दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव येथे गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी धाराशिव येथे आलेल्या मिश्र यांनी जिल्हा प्रभारी पोलीस अधीक्षक व अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट शब्दांत जाब विचारला.! “बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना इतका दिवस का थांबवण्यात आले? बदलीचे आदेश काढल्यानंतर तत्काळ त्यांना नवीन पदस्थानी पाठवणे बंधनकारक आहे. मग हे कर्मचारी अजून जुन्याच ठिकाणी का कार्यरत आहेत?” असा जाब त्यांनी खडसावून विचारल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले असल्याचेही समजते. तसेच “जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना कामासाठी बोलवू शकता, मात्र सध्या ते कर्मचाऱ्यांना मूळ बदलीच्या ठिकाणी सोडणे अत्यावश्यक आहे” असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात सध्या प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आणि जिल्ह्यात ‘लेडी सिंघम’ म्हणून परिचित असलेल्या शपकथ आमना या आता विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी करून बदली झालेले कर्मचारी तत्काळ त्यांच्या नवीन पदस्थानी सोडतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींमुळे जिल्हा पोलीस दलामध्ये एकप्रकारे खळबळ उडाली असून, बदली आदेश राबविण्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
