कळंब ड्रग्स प्रकरण – नगरसेवक मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी; परभणी कारागृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू
कळंब | लोकविचार
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी नगरसेवक मोसिन सलीम मिर्झा आणि मावळ येथील सुशांत सुतार यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना आज, २५ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांनी आणखी आरोपी निष्पन्न करण्यासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने एक दिवसाचीच वाढीव पोलीस कोठडी दिली होती. ही मुदत संपल्यानंतर आज दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, नगरसेवक मोसीन मिर्झाला पुढील प्रक्रियेसाठी परभणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून, त्याला परभणी कारागृहात रवानगी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुशांत सुतार याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
३ ऑगस्टला एलसीबीची कारवाई
या प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी केला होता. कळंब-येरमाळा रोडवरील पायरा तलाव परिसरात कारवाई करून निखिल जाधव व अरविंद कांबळे यांच्याकडून ११.२१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले होते. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत नगरसेवक मोसीन मिर्झासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली.
आता मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर या प्रकरणातील पुढील तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे कळंबसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कळंब पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा गंभीर प्रश्न
दरम्यान, या प्रकरणात कळंब पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत केवळ सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. या प्रकरणातील पेडलर किती आहेत? सदरील ड्रग्ज नेमके कुठून आले? ते कोणाला विक्री केले जात होते? आरोपींचे सीडीआर, बँक व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण तपासण्यात आली आहे का? या संपूर्ण व्यवहारामागे आणखी कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का, याचाही तपास होणे आवश्यक आहे.
मात्र या सर्व बाबींचा सखोल तपास होणे अपेक्षित असताना पोलिसांचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही ड्रग्ज रॅकेटचा मुळापर्यंत तपास कधी?
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ड्रग्जविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली असून, कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा असो किंवा आपल्या पक्षातला असो, सर्वात अगोदर त्याला फटके मारून आतमध्ये घाला, असे कडक आदेश दिले आहेत. असे असतानाही पोलिसांना या ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यात अद्याप यश आलेले नाही.
किमान आता तरी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी कारवाईचा धडाका लावत संपूर्ण ड्रग्ज रॅकेट मुळासकट उखडून फेकणार का, याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
लोकविचार — सत्य शोधून लिहिण्याची ताकदसंपादक : अमजद सय्यद | 083900 88786











