‘माऊली’ प्रकरणावर प्रशासन गप्प? १४ ऑगस्टला आमरण उपोषण; कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन!
धाराशिव लोकविचार
‘माऊली इंटरप्राईजेस’ आणि ‘माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने कथित बोगस देयके काढून शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपांप्रकरणी प्रशासनाने कारवाई न केल्याने तक्रारदार सुरज महादेव माळी यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून, त्यानंतरही दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा स्मरणपत्राद्वारे देण्यात आला आहे.
माळी यांनी ३ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १० जुलै रोजी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे स्मरणपत्रात नमूद आहे. मात्र, जवळपास महिनाभराचा कालावधी उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारीनुसार, ‘माऊली इंटरप्राईजेस’च्या नावाने २५० प्रिंटर टोनरच्या पुरवठ्यापोटी ११ लाख ५० हजार ५०० रुपये, तर ‘माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने १७ लाख ७१ हजार ६३ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. वाहनांच्या वापराच्या नोंदी, एकाच वाहनाचा एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये वापर दाखविणे, प्रत्यक्ष अंतरापेक्षा अधिक किलोमीटर दाखविणे तसेच कथित बनावट स्वाक्षरी व शिक्क्यांचा वापर केल्याचे आरोपही तक्रारीत करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील बिले, वर्क ऑर्डर, पावत्या, एमबी नोंदी, वाहन वापराच्या नोंदी आणि बँक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी माळी यांनी केली आहे. आरटीआयअंतर्गत मागविलेली माहिती अपूर्ण अथवा चुकीची मिळाल्याचाही त्यांचा आरोप आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊनही संबंधित विभागाकडून दखल का घेतली जात नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी माळी यांनी केली आहे.
दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण आणि त्यानंतर १५ ऑगस्टच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. माळी यांनी १० ऑगस्ट रोजी दिलेल्या स्मरणपत्राच्या प्रती प्रधान सचिव, पालकमंत्री प्रताप सरनाईक, धाराशिव पाटबंधारे मंडळ आणि कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग यांनाही पाठविल्याचे निवेदनात नमूद आहे.
मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होऊनच सत्यता स्पष्ट होणे अपेक्षित आहे. प्रशासन आता या गंभीर इशाऱ्याची आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची काय दखल घेते, याकडे धाराशिवचे लक्ष लागले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











