‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ? बोगस बिलांचा आरोप, धाराशिव मध्यम प्रकल्प विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!
धाराशिव लोकविचार (भाग एक)
धाराशिव माध्यम प्रकल्प विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आरोप समोर आले असून, ‘माऊली इंटरप्राईजेस’ आणि ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या नावाने बोगस बिले तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार सुरज महादेव माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.माळी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘माऊली इंटरप्राईजेस, धाराशिव’च्या नावाने 250 प्रिंटर टोनरचा पुरवठा दाखवून तब्बल 11 लाख 50 हजार 500 रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
संबंधित फर्म प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, वर्क ऑर्डर, पावती, पुरवठा आणि बिलाची नोंद यांची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.याशिवाय ‘माऊली टूर अँड ट्रॅव्हल्स, आळणी’च्या नावाने 17 लाख 71 हजार 63 रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित फर्म आपल्या नावाचा गैरवापर करून तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.निवेदनातील सर्वात गंभीर आरोप वाहनांच्या वापराबाबत आहेत. एकाच वाहन क्रमांकाची एकाच दिवशी मुंबई आणि औरंगाबाद अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वापर झाल्याचे दाखवण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
तसेच काही प्रवासांमध्ये प्रत्यक्ष अंतरापेक्षा मोठ्या प्रमाणात किलोमीटर दाखवून शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, काही बिले व कागदपत्रांवर बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून मुद्रा बँकेमार्फत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित सर्व बिलांची, वर्क ऑर्डरची, पावत्यांची, एमबी नोंदींची, वाहन वापराच्या नोंदींची आणि बँक व्यवहारांची स्वतंत्रपणे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरटीआयच्या माहितीवरही संशय?
तक्रारदाराने या प्रकरणासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती. मात्र, संबंधित माहिती वेळेत व पूर्ण स्वरूपात देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार कार्यालयात जाऊनही अपूर्ण अथवा चुकीची माहिती देण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच 24 जून 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली असता, चौकशी करण्यास नकार देत ‘खुशाल कोर्टात जा’ अशा स्वरूपाची दमदाटी करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या सर्व आरोपांमुळे शासकीय निधीच्या वापरावर तसेच संबंधित कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या आरोपांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे.संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सुरज महादेव माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
(भाग एक)
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


