धाराशिव शहर पोलीस ठाणे मिसिंग प्रकरणांच्या तपासात अव्वल.. सहा महिन्यांत ४५ पैकी ४० तक्रारींचा यशस्वी छडा!
धाराशिव लोकविचार
हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे हे पोलीस यंत्रणेसमोरील सर्वात संवेदनशील आणि आव्हानात्मक काम मानले जाते. अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. धाराशिव शहर पोलीस ठाण्याने मागील सहा महिन्यांत हरवलेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. जानेवारी २०२६ ते जून २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या एकूण ४५ मिसिंग तक्रारींपैकी तब्बल ४० प्रकरणांचा यशस्वी छडा लावण्यात धाराशिव शहर पोलिसांना यश आले असून या कामगिरीमुळे पालकवर्ग, नागरिक तसेच जिल्हाभरातून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वात ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली आहे. मिसिंग टेबलची जबाबदारी सांभाळणारे पोलीस अंमलदार बालाजी काटकर आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री देशमुख यांनी अथक परिश्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गोपनीय माहिती तसेच विविध तपास पद्धतींचा अवलंब करून अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी उलगडा केला.
विशेष म्हणजे, दिनांक १६ जून रोजी दाखल झालेल्या एका मिसिंग प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे किंवा मोबाईल लोकेशन उपलब्ध नसताना केवळ तपास कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. संबंधित व्यक्ती बार्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. तपासाच्या विविध धाग्यांची सांगड घालत आणि माहितीचे बारकाईने विश्लेषण करत हे यश संपादन करण्यात आले.
तसेच दिनांक ११ जून रोजी दाखल झालेल्या आणखी एका प्रकरणात हरवलेली व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. आधुनिक तांत्रिक साधने, माहितीचे विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे त्या प्रकरणाचाही यशस्वी छडा लावण्यात आला. या दोन्ही प्रकरणांनी धाराशिव शहर पोलिसांच्या तपास कौशल्याची प्रचिती दिली आहे.
दाखल झालेल्या ४५ प्रकरणांपैकी तब्बल १५ प्रकरणे ही १८ वर्षांवरील युवक-युवतींशी संबंधित होती. अनेक युवक-युवतींनी घरातून निघून जाऊन वेगवेगळ्या ट्रस्टमध्ये विवाह नोंदणी अथवा रजिस्टर मॅरेज केले होते. अशा प्रकरणांमध्ये केवळ व्यक्ती शोधणे एवढेच आव्हान नसून त्यानंतर निर्माण होणारी सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक परिस्थिती हाताळणे हे अधिक कठीण काम असते.
हरवलेल्या युवक-युवती पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून घेणे, दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्यांचे समुपदेशन करणे ही मोठी जबाबदारी पोलिसांवर येत होती. काही प्रकरणांमध्ये विवाह केलेल्या युवक-युवतींना कुटुंबीयांनी स्वीकारले, तर काही प्रकरणांमध्ये तीव्र विरोधाची भूमिका घेण्यात आली. काही वेळा परस्परांविरुद्ध तक्रारी देण्याची तसेच वाद वाढून मारहाणीची वेळ येण्याची परिस्थितीही निर्माण झाली होती.
अशा संवेदनशील प्रसंगी पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणे दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले. सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते तसेच संबंधित कुटुंबांशी जवळीक असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावून सर्वांना एकत्र बसविण्यात आले. संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक तोडगा काढण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे अनेक कुटुंबांमधील तणाव कमी झाला आणि सामाजिक सलोखा टिकविण्यास मदत झाली.
धाराशिव शहर पोलिसांनी केवळ हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यापुरतेच काम मर्यादित ठेवले नाही, तर त्या व्यक्तींना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे, कुटुंबातील मतभेद दूर करणे आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हेही महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यामुळे मिसिंग प्रकरणांच्या तपासात धाराशिव शहर पोलीस ठाणे जिल्ह्यात अग्रस्थानी राहिले असल्याचे दिसून येते.
सध्या उर्वरित पाच प्रकरणांचा तपासही वेगाने सुरू असून विविध तांत्रिक माध्यमे, गोपनीय माहिती आणि तपासाच्या इतर पद्धतींचा वापर करून त्या प्रकरणांचाही लवकरच छडा लावला जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक ऋतू खोखर यांनी हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या आदेशांचे काटेकोर पालन करत धाराशिव शहर पोलिसांनी संवेदनशीलता, तत्परता आणि व्यावसायिक कौशल्य यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणला आहे. परिणामी, हरवलेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत धाराशिव शहर पोलीस ठाण्याने उल्लेखनीय यश संपादन करत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
या कामगिरीमुळे पालकवर्ग, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून, “मिसिंग प्रकरणांच्या तपासात विश्वासार्ह आणि संवेदनशील पोलीस ठाणे” अशी ओळख धाराशिव शहर पोलिसांनी निर्माण केली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


